सरपंच हत्या प्रकरण : आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन
बीड (1 जानेवारी 2025) : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे. आरोपी वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याची सखोल चौकशी सीआयडी करीत असताना शासनाकडून आता आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता लवकारात लवकर तपास लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाल्मीक कराडला काल रात्री केज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.





सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात शासनाकडून एसआयटी नेमण्यात आली आहे. यात आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी, पुणे अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाकडून या घटनेचा संपूर्ण तपास करण्यात येणार आहे.
यांचा एसआयटी पथकात समावेश
या प्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांची एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. यात आयपीएस बसवराज तेली, पोलिस उप अधीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलिस शिपाई संतोष गित्ते, असे या अधिकार्यांचे नाव आहे.
