किनगावातील शेतकर्याचा अडीच लाखाचा हरभरा अज्ञाताने पेटवला

यावल (17 मार्च 2025) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील एका शेतकर्याच्या शेतात हरभरा पिकाची कापणी करून एका ठिकाणी ढीग करून ठेवण्यात आला असतानाच या हरभर्याला अज्ञात माथेफिरूने आग लावली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. आगीत शेतकर्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले.
दुसर्यांदा शेतकर्याला झळ
शेतकर्याचे गेतवर्षी देखील याच शेतातील मका पीक देखील अज्ञाताने जाळून टाकले होते व आता हरभरा पिक जाळून टाकल्यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किनगाव बुद्रुक गावातील रहिवासी मुरली कोळी यांनी आपल्या शेतात पाच एकर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड केली होती. हरभरा पीक आता कापणी योग्य झाल्यानंतर त्यांनी सदर हरभरा कापून शेतात एका ठिकाणी ढीग करून ठेवला होता.
शनिवारी रात्री कोणीतरी अज्ञात माथेफिरूने कोरड्या हरभर्याला आग लावून दिली. हा प्रकार निर्दशनास येताच शेतकर्यांनी शेतात धाव घेतली. डोळ्यासमोरच संपूर्ण मेहनतीने उत्पन्न काढलेला हरभरा पेटून खाक झाला. यामध्ये शेतकर्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


