आमदार राजूमामा भोळेंच्या नेतृत्वाचे मुंबईत मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुंबई (17 जानेवारी 2026) : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करत सर्व 46 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या अभूतपूर्व यशानंतर आमदार भोळे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भोळे यांचा विशेष सत्कार करून जळगावच्या विकासासाठी नवा संकल्प सोडला.
46 जागांवर भाजपाचे यश
जळगाव महापालिकेच्या 46 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार केला होता. आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली होती. ’विकास’ आणि ’पारदर्शक प्रशासन’ या मुद्द्यांवर त्यांनी मतदारांशी संवाद साधला. निकालाअंती, सर्वच्या सर्व 46 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा होत आहे. विरोधकांना एकाही जागेवर आपले खाते उघडता आले नाही.

या मोठ्या विजयाची माहिती देण्यासाठी आणि पुढील नियोजनासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी भोळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या निवडणूक नियोजनाचे कौतुक केले.
जळगावकरांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, जळगावकरांनी भाजपवर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमदार भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल.
हा तर जनता व कार्यकर्त्याचा विजय
याबद्दल आमदार भोळे म्हणाले की, हा विजय माझा नसून जळगावातील प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याचे हे फळ आहे. आता आमचे लक्ष फक्त आणि फक्त जळगावच्या सर्वांगीण विकासावर असेल.

