नियतीने बोलावल्यावर जावे लागेलच ! चार दिवसांपूर्वीच बोलले अन् अचानक घेतला जगाचा निरोप
पुणे (29 जानेवारी 2026) : अजितदादा पवारांच्या अचानक एक्झिटने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या निधनानं बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. हजारो कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. त्यातच अजित पवारांनी चासर दिवसांपूर्वीच केलेल्या भाषणातील एक वाक्य व्हायरल झाले आहे. ज्यात त्यांनी नियतीने बोलावल्यावर जावे लागेल असं विधान केले होते.
काय म्हणाले होते दादा ?
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांची 24 जानेवारीला सभा पार पडली होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही-आम्ही आज असू, उद्या नसू. काळाच्या, नियतीच्या पुढे बोलावणे आले तर प्रत्येकाला जायचंय परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना राजकारण हेच सर्वस्व नाही. राजकारण होत असते. निवडणुका संपल्यावर राजकारण विसरायचे असते पण ज्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे हे पाहिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं होते.
जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी कामे धडाडीने करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. तुमचे प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे. हीच माझी सर्वात मोठी प्रेरणादेखील आहे. त्यामुळे मी धावपळ करत असतो. या निवडणुकीत मी इतकी धावपळ केली, सकाळी सांगलीत जायचो, तिथे सभा करायचो, तिथून लातूरला यायचो तिथे सभा करायचो, लातूरवरून परभणी, परभणीतून अमरावती आणि तिथून नागपूरला जाऊन रात्री मुक्कामाला पुण्याला यायचो असं अजित पवारांनी म्हटलं होते.
अजित पवारांचे विमान अपघातात नधन
चार दिवसांपूर्वी भाषणातून कार्यकर्त्यांना सल्ला देणारे अजित पवार आज हयात नाहीत हे कुणालाही न पटणारे आहे. अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा नेता आता या जगात नाही त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. अजित पवारांसारखा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला ही खंत कायम सगळ्यांच्या मनात राहील.
