अंतर्नाद प्रतिष्ठानची वक्तृत्व स्पर्धा म्हणजे शिवविचार जागवणारे प्रभावी माध्यम : मान्यवरांचा सूर

जिल्हास्तरिय शिवजयंती महावकृत्व स्पर्धेत 379 स्पर्धकांचा सहभाग


भुसावळ (21 फेब्रुवारी 2026) : विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीची भावना विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात येणार्‍या अंतर्नाद प्रतिष्ठानच्या स्पर्धांना जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रभावी प्रसार होत आहे, असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सलग नवव्या वर्षी जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ येथे 19 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 379 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी वकृत्व सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपशिक्षण अधिकारी रागिणी चव्हाण, ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश विसपुते, प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, समन्वयक शैलेंद्र महाजन आणि सहसमन्वयक विक्रांत चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप सोनवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले.

स्पर्धा इयत्ता पहिली ते दहावी तसेच खुला गट अशा पाच गटांमध्ये घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराज यांची गुणवैशिष्ट्ये, गड किल्ले – शिवशाहीचे सामर्थ्य, छत्रपती शिवाजी महाराज – स्वराज्याचा सूर्योदय, छत्रपती शिवाजी महाराज भोसले बोलतोय, शिवशाहीतील लोकशाही तत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी क्षेत्रातील कार्य आणि जाणता राजा – छत्रपती शिवाजी महाराज या विषयांवर स्पर्धकांनी प्रभावी सादरीकरण केले.

स्पर्धकांचे परीक्षण आशय, विषय मांडणी, सभाधिटपणा, हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि परिणामकारकता या निकषांवर करण्यात आले. प्रत्येक गटासाठी दोन परीक्षक नियुक्त करण्यात आले होते. दोन्ही परीक्षकांच्या गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेते निवडण्यात येणार असून त्यांची अंतिम फेरी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता नहाटा कॉलेज लायब्ररी हॉल, भुसावळ येथे होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार असून विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक आणि शिवचरित्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, जीवन महाजन, अमितकुमार पाटील, राजू वारके, समाधान जाधव, हितेंद्र नेमाडे, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, देव सरकटे, डॉ. श्यामकुमार दुसाने, उमेश फिरके, शिरीष कोल्हे, कपिल धांडे, विपीन वारके, तेजेंद्र महाजन, केतन महाजन, ललित महाजन, हर्षा पाटील तसेच अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

40 परीक्षकांनी केले परीक्षण
स्पर्धेचे परीक्षण एस.एस. अहिरे, शैलेंद्र वासकर, ज्ञानेश्वर मोझे, प्रकाश विसपुते, वसंत सोनवणे, गिरीश महाजन, वर्षा सुरवाडे, जी.व्ही. पाटील, पी.जी. पाटील, टी.एम. करनकाळ, लीना अहिरे, नीलकंठ खाचणे, ऋषिकेश पवार, संध्या भोळे, केतन वाघ, भाग्यश्री रायकर, वृक्षवल्ली भगत, शीतल इंगळे, कांचन चौधरी, जागृती खडसे, निलेश पाटील, रुपाली कोल्हे, पल्लवी बनसोडे, चैताली पाचपांडे, दीपाली भंगाळे, मीना रामटेके, लीना पाटील, पंकज पाटील, रमाकांत पाटील, एस.एस. कुरकुरे, ज्योती सनेर, जयश्री काळवीट, पूनम चौधरी, योगिता परतणे, जगदीश माळी, पूजा चौधरी, चेतना खडसे, संदीप बोरोले, रुपाली सोनवणे आदींनी केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !