यावल-रावेर तालुक्यात वादळी पावसाने केळी उत्पादक संकटात : प्रशासन शेतकर्‍यांच्या बांधावर !

आमदार अमोल जावळे यांनी दिल्या पंचनाम्याच्या सूचना : सोपस्कार नको आता हवी थेट भरपाई ; उत्पादकांचा सूर


रावेर-यावल (3 एप्रिल 2026) : रावेर व यावल तालुक्यात बुधवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मक्याच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरात अवकाळी पावसाची हजेरी होती. मात्र काल झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. प्रचंड वार्‍यामुळे कापणीसाठी तयार असलेल्या केळी बागा मोडून पडल्या असून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे.



सुमारे पाऊण तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम राहिला. या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये केळी बागांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तात्काळ हालचाल करत आज सकाळी लवकरच शेतकर्‍यांच्या बांधावर भेटी दिल्या. रावेर तालुक्यातील नेहता, दोधा, अटवाडे आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार दिपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्यासह तलाठी, कृषी सहायक व इतर अधिकारी उपस्थित होते.

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरचे सभापती प्रल्हाद पाटील, राजन लासूरकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत देशमुख, माजी सरपंच महेंद्र पाटील, धीरज धनके, राजू सवर्ण, लखन महाजन, योगेश महाजन, संजय महाजन, आमदार अमोल जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील, स्वीय सहाय्यक योगेश साळुंखे, जनार्दन पाटील, गणेश धनायते, पवन चौधरी, निलेश सावळे आदी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !