भाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी मुक्ताईनगरात तडजोड

शरद पवारांची जळगावात स्पष्टोक्ती : स्थानिक राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षाने जळगाव जिल्हा विकासात मागे
जळगाव : भाजप-शिवसेनेला पराभूत करणे हेच आमचे एकमेव लक्ष असल्याने काही ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोड करण्यात आली शिवाय मुक्ताईनगरातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांची माघार ही जाणीवपूर्वक केलेली तडजोड असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी बुधवारी जळगावात केले. पवार पुढे म्हणाले की, एकेकाळी जळगाव जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होता मात्र जिल्ह्यातल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हा जिल्हा मागे राहिला आहे. जळगाव जिल्ह्यात रस्ते अस्तित्वात आहे की नाही ? असा प्रश्न आहे.
ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष
कलम 370 या मुद्यासंदर्भात बोलतांना खासदार शरद पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षात सिंचन, शेतकरी, आत्महत्या, कर्जमाफी, रस्ते यासारखे प्रश्न प्रलंबित ठेवले त्यामुळे त्यांना सांगण्यासारखे काही नसल्याने कलम 370 या मुद्याचा वापर केला जात आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता काही जण ज्योतिषाचा सल्ला घेऊन भविष्य वर्तवितात, अशी खिल्लीही खासदार शरद पवार यांनी उडवली. यावेळी पत्रकार परीषदेत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तथा राष्ट्रवादीचे पुरस्कृत चंद्रकांत पाटील उपस्थित होते.