आयकर विभागाची नाशकासह धुळे व नंदुरबारात छापेमारी : 240 कोटींची मालमत्ता जप्त
नाशिक : आयगर विभागाने सलग पाच दिवस केलेल्या कारवाईत सुमारे 240 कोटींची मालमत्ता उत्तर महाराष्ट्रातून जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. जप्त मालमत्तेमध्ये सहाकोटींची रोकड, पाच कोटींच्या दागिन्यांचाही समावेश आहे. इतकी अफाट संपत्ती जमवली कशी आणि आतापर्यंत याकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
एकाचवेळी 175 अधिकार्यांची धाड
जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले आहेत. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी 22 गाड्यांमधून 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले होते. त्यांच्यासोबत तगडा पोलीस बंदोबस्तही होता.






