तरुणीच्या धाडसाला सलाम ! : पित्याला अर्धांगवायूचा झटका येताच दुचाकीवरून शंभर किलोमीटर प्रवास करीत वाचवले प्राण
अर्धांगवायू झालेल्या पित्याला मिळाले वेळीच उपचार
चाळीसगाव : शेतकरी पित्याला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर घाबरून न जाता तरुणीने थेट दुचाकीवरूनच शंभर किलोमीटर अंतराचा चित्तथरारक प्रवास करीत वेळीच त्यांना उपचारार्थ हलवल्याने पित्याचे प्राण वाचले. चाळीसगाव तालुक्यातील जामडीच्या तरुणीची ही यशोगाथा. कठीण परीस्थितीतही आई-वडिलांचा आधार होवून या तरुणीने दुचाकी चालवून नेत वडिलांना वेळीच उपचारार्थ हलवल्याने ही तरुणी तिच्या धाडसामुळे चर्चेत आली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होताना दिसून येत आहे.
प्रसंगावधान राखत वाचवले वडिलांचे प्राण
शेतकरी असलेल्या पित्याला अचानक अर्धागवायूचा झटका आला मात्र धाडसी आरतीने घाबरून न जाता दुचाकीवर पित्यास बसवून आईला पाठीमागून घट्ट पकडायला लावले. औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करत तिने तब्बल 100 किमी अंतर पार केले आणि औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल केले. आरतीने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वडिलांचा प्राण वाचला. आरतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


दुचाकीवरून शंभर किलोमीटर चित्तथरारक प्रवास
नागदपासून जवळ असलेल्या जामडी (ता.चाळीसगाव, जि.जळगाव) येथील शेतकरी संजय परदेशी यांना रस्त्यात आठ किमीचा प्रवास औट्रम घाट आरती व तिच्या आईने आजारी वडिलांना दुचाकीवर बसवूनच सुरू केला. वाटेतच प्रकृती अधिकच खराब झाली. तेव्हा आरतीने आईला त्यांना घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. वाटेत अत्यंत खडतर व आठ किलोमीटर अंतर असलेला नागद घाटातील ट्रिपल सीट प्रवास हा अत्यंत धोकादायक होता. तरीही न डगमगता तीने वडिलांना सुखरूप रुग्णालयात आणले. दोन मुली आहे. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. यामुळे घरात आता परदेशी त्यांची पत्नी व मुलगी आरती हे तिघेच राहतात. आरती ही राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत आहे.
वेळेत उपचारामुळे वाचले वडिलांचे प्राण
चार दिवसांपूर्वी संजय परदेशी यांना अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे त्यांची पत्नी व आरती हे काळजीत पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असल्याने तसेच वाहनाची व्यवस्था नसल्याने आरतीने दुचाकीवर वडिलांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. तिने तातडीने वडिलांना दुचाकीवर बसवून पाठीमागे आईला त्यांना घट्ट धरून बसण्यास सांगितले आणि औरंगाबादकडे प्रवास सुरू केला. जामडीपासून औरंगाबादचे अंतर हे तब्बल शंभर किलोमीटरचे… रस्ताही खराब … अशात आजारी वडिलांसह ट्रिपल सीट प्रवास सोपा नव्हता मात्र आरतीने हिंमत न हारता साडेतीन तासात औरंगाबाद गाठत खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले . वेळेवर उपचार मिळाल्याने वडिलांचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले
धाडसाबद्दल केला सत्कार
आरतीने दाखविलेल्या धाडसाबद्दल राष्ट्रीय विद्यालयात आरतीचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अर्जुन पाटील, प्राचार्य बी.एस.साळवे, बी.टी.जगताप, पी.एन.पवार, शेखर पाटील, प्रशांत पाटील, चव्हाण, गायकवाड, दीप्ती पाटील आदींची उपस्थिती होती.


