मानवाच्या कल्याणासाठीच अन्नकुट महोत्सवाची परंपरा


शास्त्री धर्म प्रसाददास : स्वामी नारायण गुरुकुलमध्ये दीपावलीनिमित्त महोत्सव

फैजपूर : भारतीय हिंदू संस्कृतीवर अनेक प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. पण ही संस्कृती नष्ट होऊ शकली नाही कारण विविध उत्सवांच्या माध्यमातून संत व हरीभक्त यांनी एकत्र येऊन सत्संग करून संस्कृती टिकवून ठेवली आहे व ती कधी नष्ट पण होऊ शकणार नाही. संसारात राहूनही निष्पाप होण्यासाठी अन्नकुट महोत्सवाचे महत्व व गो मातेला आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्व आहे, असे विचार स्वामी नारायण संप्रदायातील खानदेश गुरुमाऊली शास्त्री धर्मप्रसाददास यांनी व्यक्त केले. स्वामी नारायण गुरुकुलमध्ये अन्नकुट महोत्सव व पंचगव्यचे विमोचन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदास, शास्त्री राजेंद्र प्रसाद दास, आमदार शिरीष चौधरी, धर्मप्रकाशदास, स्वामी अनंत प्रकाशदास, स्वामी धर्मप्रिय दास, शरद भगत, दीपक भगत, वेदांत भगत, प्रा.व.पु.होले, पी.डी.पाटील, प्राचार्य संजय वाघुदे, मनोज पाटील आदी उपस्थित होते. गोमाता ही सुख, शांती, समृध्दी, संपन्नता, मांगल्याचे प्रतीक मानली गेली आहे. सर्व वेद, उपनिषद, पुराणे, धर्मशास्त्र व सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदात गोमातेचा महिमा सांगितला गेला आहे. गोमातेच्या पंच गव्यापासून तयार केलेल्या कामधेनू गोमय पूजा पाठ साहित्याचे विमोचन मान्यवरांंच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याचा उपयोग घरातील पूजा पाठ, होम हवनसाठी करावा, असे आवाहन स्वामी नारायण गो शाळेचे संचालक शास्त्री भक्ती स्वरूप दास यांनी यावेळी केले.

प्राचीन काळापासून अन्नकुट महोत्सवाची परंपरा
शास्त्री भक्तीकिशोरदास म्हणाले की, भगवंताच्या कृपेने व शेतकर्‍यानी मेहनत करून पिकविलेले धान्य हे दिवाळीच्या दिवसात उत्पन्न होते. सर्वात आधी 56 भोग नैवेद्य म्हणूून अन्नकुट महोत्सवाची परंपरा अती प्राचीन काळापासून सुरू आहे, असे सांगून हरी भक्तांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. श्री हरी ट्रॅव्हलचे संचालक सुनील चौधरी, राजु चौधरी, हेमराज चौधरी, नंदु पाटील, नितीन महाजन, नीळकंठ भारंबे व रावेर-यावल तालुक्यातील हरीभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन शास्त्री भक्ती किशोरदास यांनी केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !