उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेगा रीचार्जसाठी साकडे
फैजपूर : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची अमोल जावळे यांनी मुंबई येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या सोबत सदिच्छा भेट घेतली. युती सरकारच्या काळात कृषिमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या मागणीची दाखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शेळगाव प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आहे. स्व.हरीभाऊंचे स्वप्न असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल अमोल जावळेंनी या भेटीत त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त केले.
मेगा रीचार्ज प्रकल्पाला गती देण्याची मागणी
कृषिमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांचे स्वप्न असलेला मेगा रीरचार्ज प्रकल्प स्व.हरीभाऊ यांनी त्यांच्या कार्यकाळात संसदेत सातत्याने पाठपुरावा करून प्रकल्पाच्या कामास गती मिळवून दिली होती. जळगाव जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्ष्यात घेता मेगा रीचार्ज प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता मेगा रीचार्ज प्रकल्पास गती द्यावी, असे साकडं जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांच्या वतीने अमोल जावळे यांनी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना घातले आहे.

कार्बन शून्य भारताच्या दिशेने हे मोठं पाऊल : अमोल जावळे
एशियातील नाविण्यपूर्ण मेगा रीचार्ज प्रकल्पाचे तीन टप्पे आहेत. धरण, उजवा कालवा आणि डावा कालवा. धरण आणि उजवा कालव्याचा डीपीआर तयार असून डाव्या कालव्याच्या टप्पा एकचा डीपीआर पूर्णत्वाकडे आहे. व्याप कॉक्स ही कंपनी या प्रकल्पाचे काम पाहत आहे. या कंपनीने संपूर्ण प्रकल्पाचे एकत्रीकरण करून संयुक्तिक प्रकल्प अहवाल सप्टेंबर 22 महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात याव्यात तसेच केंद्रीय ग्रामीण भूजल मंत्रालयास प्रकल्प अहवाल सादर करून प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, असे साकडे मी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घातले आहे. हा प्रकल्प नाविन्य पूर्ण पद्धतीने जलसंवर्धनाच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्बन शून्य भारताच्या दिशेने हे मोठं पाऊल असणार आहे, अश्या भावना अमोल जावळे यांनी व्यक्त केल्या आहे.