भुसावळात विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन

50 मिनिटे वाहतूक ठप्प : सात दिवसांत रस्त्यांची कामे न झाल्यास लोकप्रतिनिधींना काळे फासण्यासह तीव्र आंदोलनाचा इशारा
भुसावळ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवून वर्दळीच्या रस्त्यांचे सात दिवसांच्या आत डांबरीकरण करावे, अमृत योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची दोषींकडून वसुली करावी शिवाय कोच फॅक्टरीच्या नावाने अतिक्रमण हटवून गोरगरीबांचे संसार उघड्यावर आल्याने अतिक्रमणधारकांना पुन्हा रेल्वेच्या त्याच जागेवर निवारा व दुकाने बांधू द्यावीत, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाहक प्राण गमावावे लागल्याने लोकप्रतिनिधींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी मंगळवार, 7 रोजी दुपारी अडीच वाजता यावल नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना व जनआधार विकास पार्टीच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल 50 मिनिटे चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाले. प्रसंगी तहसीलदार दीपक धीवरे यांना घटनास्थळी बोलावण्यात आल्यानंतर त्यांनी समस्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
या रस्ता रोको आंदोलनात सहभाग
माजी आमदार संतोष चौधरी, कृउबा समितीचे सभापती सचिन चौधरी, माजी गराध्यक्ष उमेश नमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, दीपक मराठे, आशिक खान शेर खान, माजी नगरसेवक ललित मराठे, सतीश घुले, अशोक (आऊं) चौधरी, अनिता खरारे, बुटासिंग चितोडीया, युवराज पाटील, रवींद्र निकम, मुन्ना सोनवणे आदींची उपस्थिती होती.


