योगी सरकारचा मोठा निर्णय : शालेय अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला
Yogi Sarkar’s big decision: History of Mughals excluded from school curriculum नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने मात्र दोन्ही शिक्षण मंडळांच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्डातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकविला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. 2023-24 या नव्या सत्रापासून हा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून ‘भारतीय इतिहास’ यातील शासक ते मुघल दरबार हे धडे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला दुसरीकडे नागरीकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरीकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटविण्यात आले आहेत.
मुघल दरबार हटवला
भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. तसेच अकरावीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये योगी सरकारने आग्रा मुघल म्युझियमचं नाव बदललं होतं. योगी आदित्यनाथ सरकारने हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असं ठेवलं होतं. गुलामीची मानसिकता दाखवणारी प्रतीके उत्तर प्रदेशात नकोत या आशयाचे ट्वीटही योगी आदित्यनाथ यांनी केले होते.




आपली संस्कृती महत्त्वाची
आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवलं पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला नाही त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
मुघलांनी प्रगती साधली होती
भाजपाचे सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळे करते आहे. मात्र नुसते इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती हे कसे विसरता येईल?, अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षण मंत्री नवाब इकबाल मेहमुद यांनी दिली आहे.