साखरझोपेत चालकाचे नियंत्रण सुटले : ट्रक कठडे तोडून वाघूर पुलावर लटकला


भुसावळ : रात्रभर सुरू असलेल्या प्रवासामुळे भल्या पहाटे आलेल्या साखर झोपेमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक चक्क राष्ट्रीय महामार्गावरील वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला. शुक्रवार, 25 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.

चालकाने उडी घेतल्याने बचावला
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने साकेगावजवळ वळण देऊन थेट वाघूर नदीवर मार्ग जोडण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण अंधूक सूर्यप्रकाश व साखर झोपेमुळे ट्रक चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने ट्रक (जी.जे.15 ए.टी.0968त्र चक्क वाघूर नदीच्या संरक्षण कठड्यास धडक देत सुमारे 50 फूट उंचीवरील पुलाचे जवळपास दहा कठडे तोडत ट्रक अर्धा पुलावर व अर्धा खाली अशा पद्धतीने अडकला. चालकाने प्रसंगावधान राखत लगेच ट्रकमधून उडी घेतल्याने तो बचावला तर ‘देव तारी त्याला कोण मारी’ असा प्रत्यय याठिकाणी आला. सुदैवाने ट्रक कठड्यावर अडकला. दुर्दैवाने जर ट्रक वाघूर पात्रात पडला असता तर आधीच महामार्गावरून 50 फूट खोल व त्यातच महामार्ग कामासाठी नवीन पूल बांधणीसाठी पात्राच्या खाली आणखीन 10 फूट खोल खड्डे करण्यात आले आहेत. त्याच्यात 20 फुटांपर्यंतचे धारदार सळईचे फाउंडेशन तयार करण्यात आले आहे. नेमका त्याच ठिकाणी ट्रक अडकला होता. चुकून जर खाली पडला असता तर फाऊंडेशनच्या सळया संपूर्ण ट्रकमध्ये घुसून मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

अपघातामुळे वाहतूक ठप्प
पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वाघूर नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या जवळपास तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस एएसआय गुलाब मनोरे, हवालदार युसूफ शेख, मिलिंद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव देत सर्वप्रथम घटनास्थळावरून अपघातग्रस्त ट्रकला बाजूला केले. यानंतर आधी जळगावकडे जाणारी वाहतूक सोडली व काही वेळानंतर वाहतूक पूर्णत: सुरळीत झाली. वाघूर पुलावर ट्रक अडकल्याची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठत अडकलेला ट्रक पाण्यासाठी गर्दी केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !