सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात कार्य करणारा तळपता सूर्य अस्तास


भुसावळ : गेल्या सात दशकापासून जळगाव जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, गोशाळा अशा विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेतून कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बापूराव मांडे. बालपणापासून शालेय जीवनापासूनच बापू मांडे यांच्यावर संघ शाखेचे संस्कार झाले. असंख्य संघाचे कार्यकर्ते, पूर्णवेळ प्रचारक यांचे कार्य बापूराव यांनी जवळून पाहिले होते. पुढील काळात बापूराव काही काळासाठी पूर्णवेळ प्रचारक म्हणून राहिले.

नांदेड जिल्ह्यात त्यांनी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी अर्थार्जनासाठी टू व्हीलर दुरुस्ती मोटर गॅरेज सुरू केले. त्यानंतर एलआयसी एजंट म्हणून काम सुरू केले. एलआयसीचे काम करत असताना दहा महिने संघ काम आणि उर्वरित दोन महिने एलआयसी एजंट म्हणून कार्य असं त्यांनी ठरवून घेतले होते. अविरतपणे कार्य करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे 1975 ते 1990 च्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये संघ कार्याचा वटवृक्ष त्यांनी उभा केला. जळगाव जिल्ह्य कार्यवाह म्हणून दायीत्व असताना त्यांनी जिल्ह्यात त्या काळात 101 संघ शाखा उभ्या केल्या होत्या. श्रीराम मंदिर अयोध्या कार सेवा कालखंडात बापूरावांकडे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री म्हणून जबाबदारी होती. या काळात असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी कार सेवेला नेले होते. पुढील काळात बापूरावांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्याच्या हेतूने त्या काळच्या भुसावळ एज्युकेशन सोसायटी सध्याच्या श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळात कार्य सुरू केले.


बापूरावांच्या काळात संस्थेच्या विविध शाळांचे नामकरण, संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम, संस्थेच्या तीनही शाळांची सुसज्ज इमारत अशा असंख्य कार्याची पूर्तता झाली. आज रोजी मुक्ताई शिशु मंदिर, जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, महाराणा प्रताप विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, हरिपूरा आश्रमशाळा, शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या शाळा अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. साधारणतः 1998 ला शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विविध आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांनादेखील शिक्षण आणि संस्कार मिळावा या हेतूने बापूरावांनी सातपुड्याच्या पायथ्याशी हरीपुरा येथे आश्रमशाळा सुरू केली. त्यानंतर गोवंश वाढला पाहिजे या हेतूने तेथे इच्छापूर्ती गोशाळेची निर्मिती केली सोबतच बायोगॅस निर्मिती प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केले.. हरीपुराच्या उजाड अशा जमिनीमध्ये बापूरावांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आणि नंदनवन फुलविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषीभूषण आणि वनश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.‘कार्य मग्नता जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती’ या पद्याप्रमाणे बापूराव जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य करतच राहिले.

रविवार, 16 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आणि तळपत्या सूर्याचा अस्त झाला. बापूरावांच्या कार्याला मानाचा मुजरा, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करू हीच प्रार्थना.. बापूरावांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सोनू मांडे, सून , दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.. बापूरावांच्याच कार्यपथावर त्यांचे चिरंजीव सोनू मांडे मार्गक्रमण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !