रावेरसह यावल तालुका होणार सुजलाम सुफलाम
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण कामाला सुरवात
Yaval taluka will be prosperous along with Raver रावेर (29 एप्रिल 2025) : महाराष्ट्र शासनाच्या ’जलव्यवस्थापन कृषी पंधरवाडा 2025’ उपक्रमांतर्गत रावेर व यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण या महत्वाकांक्षी कामाला सुरवात झाली आहे. न्हावी-बोरखेडा पाणलोट क्षेत्रातील सातपुड्याच्या पायथ्याशी पाझर तलावाच्या गाळ उपसण्याच्या कामाने सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी आमदार अमोल जावळे यांच्या विशेष प्रयत्नांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
रावेर-यावल तालुका ‘अतिशोषित क्षेत्र’
1999 मध्ये केंद्रीय भूजल यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यात भूजल पातळी दरवर्षी एक मीटरने घटत आहे. ते. सद्यस्थितीत रावेर-यावल तालुके केंद्रीय भूजल मंडळाकडून ‘अतिशोषित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांची संकल्पना
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरणाची नैसर्गिक क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी पाझर तलाव, नाले व बंधार्यांचे गाळ उपसून खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असून, यावल-रावेर तालुक्यातील पाण्याची पातळी स्थिर राहण्यास हातभार लागणार आहे. या पद्धतीचे काम थेंब अमृताच्या माध्यमातून माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून याआधीही रावेर-यावल मतदारसंघातील नद्यांमध्ये राबविण्यात आले होते.
50 जलसंधारणाची कामे होणार
या उपक्रमासाठी मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा संधारण अधिकारी (जि. प.) जळगाव आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने यावल व रावेर तालुक्यात सुमारे 50 जलसंधारण कामे गाळमुक्त केली जाणार आहेत. यामधून सुमारे दोन लाख घनमीटर गाळ काढला जाणार आहे त्यामुळे जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी, पावसाळ्याच्या काळात कोट्यवधी लिटर पाणी भूगर्भात जिरणार असून भूजल पातळी स्थिर व सुदृढ होण्यास मदत होणार आहे. भविष्यात याचा थेट फायदा यावल-रावेर तालुक्यातील केळी पट्ट्याला होणार आहे. भूजल पातळी वाढल्याने उन्हाळ्यात पाण्याची टंचाई कमी होईल तर केळी उत्पादनात वाढ होईल तसेच वीज वापरात बचत होऊन लोडशेडिंग कमी होण्यासही मदत होणार आहे.
यांची होती उपस्थिती
या कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी बी.एस.ढंगारे, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे काकडे व सेवानिवृत्त उपअभियंता के.पी.पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जलसंधारण अधिकारी विसपुते, पी.के.माळोदे, स्थानिक सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


