चाळीसगाव पंचायत समितीचे तीन कर्मचारी कार्यमुक्त तर सात तांत्रिक सहाय्यकांना ‘शो कॉज’

चाळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकर्‍यांकडून पैसे घेतल्याप्रकरणी कारवाई : मनरेगा मार्फत विहिरी सोबतच अभिसरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर गुन्हे दाखल होणार,


चाळीसगाव (7 मे 2025) :  काही दिवसांपूर्वी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पंचायत समिती मधील मनरेगा कक्षातील कर्मचारी यांनी तालुक्यातील 4000 सिंचन विहीर मंजुरी व बिले काढण्यासाठी गोरगरीब शेतकर्‍यांकडून प्रत्येकी 20 ते 30 हजार रुपये घेतले असल्याचा आरोप करत तक्रारदार शेतकर्‍यांसह पंचायत समितीला धडक दिली होती. पैसे मागणार्‍या कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे सांगत ज्या शेतकर्‍यांकडून पैसे घेण्यात आले आहेत त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. शेतकर्‍यांकडून पैसे वसुली या कर्मचार्र्‍याना भोवले असून आमदार मंगेश चव्हाण यांच्या आक्रमक पावित्र्याची दखल घेत पंचायत गटविकास अधिकारी अ.अ.शेख यांनी मनरेगा कक्षातील राहुल अहिरे, विलास पाटील व संदीप रणदिवे या तीन कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करून जळगाव येथे हजर होण्याचे आदेश दिले आहेत तसेच मनरेगा कक्षातील तांत्रिक सहाय्यक राज पाटील, राकेश पाटील, राहुल पाटील, प्रसाद चौधरी, पंकज तायडे, धीरज मराठे, विष्णू महाले या 7 तांत्रिक सहाय्यक (ढझज) यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

या पत्रात गटविकास अधिकारी यांनी सदर कर्मचारी यांना यापूर्वी देखील दिनांक 22 मार्च 2025 व 23 एप्रिल 2025 रोजी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या मात्र तरीदेखील त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नसल्याची गंभीर बाब नमूद केली आहे.

सिंचन विहिरीसोबतच अभिसरण अंतर्गत गावागावांमध्ये बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक ची कोट्यवधींची कामे गेल्या 2 वर्षात मंजूर करण्यात आली असून या कामांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे. यात सहभागी असणारे तत्कालीन गटविकास अधिकारी व मनरेगा कक्षातील कर्मचारी आता आमदार मंगेश चव्हाण यांच्या रडारवर आहेत. पंचायत समिती मार्फत मनरेगा अभिसरण (उेर्पींशीसशपलश ) अंतर्गत सन 2023 – 24 व 2024-25 या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक ची कामे मंजूर केली गेली आहेत. या कामांच्या मंजुरी व बिल काढण्याच्या प्रक्रियेत पंचायत समितीचे त्यावेळेचे गटविकास अधिकारी व मनरेगा विभागातील कंत्राटी कर्मचारी यांनी संगनमताने व आपल्या अधिकारांचा गैरवापर करत मोठी अनियमितता केल्याच्या तसेच मंजूर कामे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेषकरून काम अपूर्ण असताना देखील कुशल बिल रेकॉर्ड करणे, ग्रामरोजगार सेवक यांच्या सही शिवाय मस्टर मागणी करणे व मस्टर काढणे असे प्रकार झाले आहेत. तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी व निकृष्ट दर्जाचे काम झाले असताना देखील पंचायत समिती गटविकास अधिकारी व सबंधित मनरेगा कक्षातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक यांनी कुशल / अकुशल बिल रेकॉर्ड करून पाठवले आहेत. हा अनेक कोटींचा अपहार असून विहिरी सोबत या प्रकरणात देखील चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार आहेत तसेच यात बडे मासे देखील अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

याबाबत आमदार चव्हाण हे या अभिसरण घोटाळ्याच्या संदर्भात रोहयो मंत्री भरत गोगावले, विधानसभा पंचायत राज समिती अध्यक्ष संतोष दानवे यांच्यासह मनरेगा महासंचालक, मनरेगा आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी लेखी तक्रार करणार आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी कन्नड घाट स्टिंग ऑपरेशन, गुटख्याच्या ट्रकचा पाठलाग, ठढज कडून वाहनचालकांची होणारी पिळवणूक याबाबत आवाज उठवला होता त्यावेळी सबंधित दोषी अधिकारी – कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली होती. सिंचन विहिरी मंजुरी हा शेतकर्‍यांशी सबंधित विषय असून आमदार चव्हाण यांची शेतकर्‍यांविषयी असलेला जिव्हाळा पाहता या प्रकरणात देखील ते शेतकर्‍यांना न्याय मिळवून देत दोषींवर कारवाई होईपर्यंत थांबणार नसल्याचे दिसते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !