खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका : मुंबई आणि ठाणे बुडाले एकनाथ कुठे?

मुंबई (28 मे 2025) : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण आणि लगतच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यावरून विरोधकांनी सत्ताधार्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत महापूर आला. ही जबाबदारी कोणाची आहे, तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कोणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की, एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडाले एकनाथ कुठे?

एकनाथ शिंदे अमित शाहा यांचे लांगुलचालन करण्यात व्यस्त आहेत. एकनाथ कुठे तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या लांगुल-चालनात आहे. अमित शाह यांनी आम्हाला सांगू नये. हे शेअर बाजारातील दलाल आहेत. त्यांना मुंबई जुगारावर लावायची आहे. भारतीय जनता पक्ष व्यापारांचा पक्ष आहे. हा शेठजींचा पक्ष आहे. शेठजींनी मुंबई आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये, अशी टीका संजय राऊतांनी केली.
