काय सांगता ! : मराठी लिहिता-वाचता येत नसल्यास रिक्षा परवाना नाहीच !

What can I say ! : If you can’t read or write Marathi, you won’t get a rickshaw license! नाशिक (14 जून 2025) : मुंबईत मराठी सक्तीवरून अनेकदा आंदोलने पहायला मिळतात मात्र नाशिकमध्ये आता रिक्षा चालकास मराठी वाचता व लिहिता येत नसल्यास परवाना मिळणार नसल्याची अट परिवहन विभागाने घातली आहे.
मराठी भाषेची मूलभूत परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आले असून त्यामुळे मात्र अनेक रिक्षा चालकांना फटका बसला आहे. गत आठवड्यात तब्बल 145 अर्जदार अपात्र ठरले आहेत.

मराठी भाषेची ही परीक्षा कोणत्याही गुणांच्या आधारावर नाही, परंतु उमेदवाराला मराठी लिहिता वाचता येते की नाही, याची चाचणी घेतली जाते. या निर्णयामुळे दररोज 15 ते 220 रिक्षा चालकांचे अर्ज नाकारले जात आहेत. नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक मराठी बोलू शकतात मात्र त्यांना वाचता आणि लिहिता येत नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी अशा भाषिक अटी नव्हत्या, त्यामुळे ही नवी अट अचानक आल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.नाशिक आरटीओच्या या नव्या अटीवर रिक्षाचालक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
नाशिकमध्ये आता रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने अलीकडेच हा नवा नियम लागू केला आहे.
अनेक रिक्षाचालक बोलणारी मराठी उत्तम जाणतात, मात्र शाळेतील शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना लिहिणं किंवा वाचणं अवघड जातं. परिणामी ते या चाचणीत नापास होतात आणि परवान्यापासून वंचित राहतात. या निर्णयावर रिक्षा चालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
