बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा


Bachchu Kadu’s hunger strike suspended अमरावती (14 जून 2025) : उदय सामंत यांची शिष्टाई सफल झाली असून बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत सात दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणार्‍या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.


प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यांनी परवापासून थेट अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारची बच्चू कडूंना 3 आश्वासने

शासनाने बच्चू कडू यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र देण्यात आले आहे. त्यात त्यांना खालील 3 आश्वासने देण्यात आली आहेत.

  1. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
  2. दिव्यांगाच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमद्ये तरतूद करण्यात येईल.
  3. उर्वरित मुद्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !