गिरीश महाजन यांची मध्यस्थी यशस्वी : सुधाकर बडगुजरांचा भाजपात प्रवेश !

पक्ष प्रवेशाबद्दल माहिती नसल्याचे सांगणारे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची उपस्थिती


मुंबई (17 जून 2025)  : नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीनंतर माहिती नसल्याचे विधान करणारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहिले. अर्थात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाल्यानंतर त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत मुंबई येथील भाजप कार्यालयात जाऊन पक्ष प्रवेश केला

यावेळी हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाच्या रस्त्यावर ढोल ताशे वाजवत हजारो कार्यकर्त्यांसह सुधाकर बडगुजर उपस्थित झाले.. त्यानंतर भाजप कार्यालयात त्यांनी प्रवेश केला परंतु यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण हे लवकर न पोहोचल्याने सुधाकर बडगुजर यांना ताटकळत थांबावे लागल्याचे दिसून आले.


गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक
सुधाकर बडगुजर म्हणाले, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यामुळे मी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र महाजन यांचे मी मनापासून आभार मानतो. गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक आहेत आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे. आपत्ती आली की ते मार्ग काढतातच आणि माझ्याबाबतीत त्यांनी मार्ग काढला, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी कौतुक केले आहे. आपल्या पर्यंत, पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहिती नाही. पण मी निष्पाप आहे. मी समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो. कोणी बाहेर येत नव्हते त्या काळात कोविड सेंटर चालू केले आणि पक्षासाठी काम केले.

सुधाकर बडगुजर यांच्यासोबत बबन घोलप यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की बडगुजर साहेबांचा पक्षात अपमान झाला म्हणून मी त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश करत आहे. सामान्य जनतेचा सन्मान होत नाही, मग अशा ठिकाणी कशाला राहायचे. येणार्‍या सर्व निवडणुकीत आपण आपला खाक्या आहे तो दाखवून देऊ आणि भाजपला विजयी करू.

नाशिक भाजपचा बालेकिल्ला : गिरीश महाजन
गिरीश महाजन म्हणाले, सगळीकडे चर्चा सुरू होती प्रवेश कधी होणार अखेर आज तो दिवस आला. आपल्याला कल्पना आहे निवडणुका समोर आहेत आणि नाशिक जिल्हा आपला बालेकिल्ला आहे. आता आपल्याला अब की बार 100 के पार करायचा आहे, अशी घोषणा देखील दिली. पक्ष मोठा करणे दलाली नाही, पक्ष मोठा करणे हा प्रामाणिकपणा आहे. अनेक लोक त्यांना कंटाळले आहेत आणि म्हणून सगळे पक्षात प्रवेश करत आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य कशा पद्धतीने काम करत आहे, त्यावर जनतेचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उबाठा असेल, काँग्रेस असेल आता जनतेचा विश्वास या पक्षांवर राहिला नाही.

मतभेद दूर करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही सर्वांनी जेव्हा बबनराव घोलप आणि सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा केली तेव्हा भाजप अधिक मजबूत होईल आणि नाशिकमध्ये अधिक मजबुतीने पुढे जाता येईल. भाजपमध्ये कुठलाही पक्षप्रवेश होतो तो विकासासाठी होतो. पक्षप्रवेश उद्या किंवा परवा होणार होता असे आम्हाला माहीत होते, परंतु गिरीश भाऊंनी आजचा मंगळवारचा दिवस चांगला आहे असे म्हणत आजच पक्षप्रवेश ठरवला आणि त्यामुळे मला आणि रवींद्र चव्हाण यांना यायला उशीर झाला, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.े




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !