भुसावळात नगरसेवक रवींद्र खरातांसह पाच जणांचा निर्घृण खून


मृतांमध्ये नगरसेवक रवींद्र खरात, मुलगा रोहित व प्रेमसागर तसेच मोठा भाऊ सुनील खरात व अन्य एकाचा समावेश : तासाभरात हल्लेखोरांना अटक करण्याची जळगाव गुन्हे शाखेला यश

भुसावळ : भुसावळचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकावर अज्ञात आरोपींनी गोळीबार तसेच चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. हल्याननंतर हल्लेखोर लागलीच पसार झाले. या घटनेने भुसावळसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व अन्य एकाचा समावेश आहे. दरम्यान, या हल्ल्यात नगरसेवक खरात यांच्या पत्नी रजनी व मुलगा हंसराज देखील जखमी झाला आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

एकाचवेळी दोघा भावंडांवर हल्ला
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समता नगरातील घराबाहेर नगरसेवक रवींद्र खरात हे बसले असतानाच दोन आरोपींनी रवींद्र खरात यांच्यावर गोळीबार केला तर त्याचवेळी गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर त्यांचे मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) हेदेखील काय झाले म्हणून पुढे आल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते प्राण वाचवण्यासाठी गल्लीतील एका घरात शिरले मात्र त्याचवेळी हल्लेखोरदेखील त्यांच्यामागे धावले त्यांनी चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेने समतानगरात मोठी खळबळ उडाली. रक्तबंबाळ अवस्थेत रवींद्र खरात यांना गोदावरीत हलवण्यात आले व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.








आरपीडी रस्त्यावर दोघा मुलांसह मित्रावरही प्राणघातक हल्ला
नगरसेवक खरात यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (28) व प्रेमसागर रवींद्र खरात (20) तसेच या भावंडांच्या एका मित्रावरही आरपीडी रस्त्यावर दोन ठिकाणी हल्लेखोरांनी चाकूने हल्ला चढवून त्यांचा खून केला. यावेळी हल्लेखोर व मयतांमध्ये झटापटही झाली मात्र हल्लेखोर खून करून पसार झाले. प्रेमसागर यांच्या मानेवर तर रोहितच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. दोघांनाही शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर त्यांना मयत घोषित करण्यात आले तर खरात भावंडांच्या जखमी अवस्थेतील मित्रालाही जळगावात हलवल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

पोलिस अधीक्षकांची धाव
भुसावळात एकाचवेळी खून झाल्याचे वृत्त पोलिस दलाला कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यातील डीबी तसेच आरसीपी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

समता नगर परीसरात बंदोबस्त वाढवला
या घटनेच्या अनुषंगाने समता नगर परीसरात पोलिसांनी आरसीपीसह जिल्ह्यावरून कुमक मागवून बंदोबस्त वाढवला आहे. रात्री घटनास्थळाची जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर अधीक्षकांनी पाहणी केली. फॉरेेन्सिक तज्ज्ञांनी ठसे तसेच छायाचित्रे घेतली. आरोपींनी खूनासाठी वापरलेला चाकू तसेच अन्य शस्त्रही पोलिसांनी जप्त केल्याचे समजते.

तासाभरात आरोपी जाळ्यात
खुनानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे त्यांनी तीनही आरोपींच्या तासाभरात मुसक्या आवळत त्यांना जळगावात हलवले. आरोपींनी नेमका खून का व कोणत्या कारणासाठी केला? याची माहिती मात्र उपलब्ध होवू शकली नाही. आरोपी अटकेच्या वृत्ताला पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला.

पत्नीसह मुलगाही जखमी
हल्यात मृत नगरसेवक रवींद्र खरात यांच्या पत्नी रजनी खरात तसेच त्यांचा मुलगा हंसराज रवींद्र खरातदेखील जखमी झाला आहे. रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात या हत्याकांडप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. भुसावळात प्रथमच एकाचवेळी पाच जणांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !