वरणगावात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी दर्शवले एकात्मतेचे दर्शन


वरणगाव : दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सांगतानिमित्त शुक्रवारी वरणगाव शहरातून दिंडी महोत्सव काढून विविध झाक्यांमधून विविधतेचे व एकात्मतेचे दर्शन घडले. स्वातंत्र्यपूर्व काळात 1944 ला ग्रामीण भागातल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी वरणगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले व आज ते देश सेवेसह विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत असून आजपर्यंत शाळेने घडवलेल्या व चांगले संस्कार रुजलेल्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ज्ञान दिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या ज्ञान दिंडीचे उद्घाटन पदवीधर आमदार सुधीर तांबे, आमदार संजय सावकारे, वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप बोरसे यांच्याहस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे, अध्यक्षा वंदना पाटील, उपाध्यक्ष कमलाकर चौधरी, सचिव चंद्रशेखर झोपे, सहसचिव संजय ढाके, सदस्य गोविंद मांडवगणे, जनार्दन पाटील, कैलास माळी, मधुकर पाटील, राजेंद्र चौधरी, रवी कोल्हे, संजय झोपे, सुभाष सराफ, दीपक मराठे सुधाकर जावळे, नीळकंठ सरोदे, मुख्याध्यापक आर.ए.वाघ आदी उपस्थित होते. या दिंडीमध्ये महाराष्ट्राची परंपरा असलेले मावळे, ग्रंथ, दिंडी संस्थेसाठी योगदान दिलेल्या माजी संस्थापक यांचे देखावे, स्त्री शिक्षण, महाराष्ट्रातील संतांचे जिवंत देखावे, राष्ट्रीय नेते, भारत माता, आपला पोशिंदा शेतकरी यासह देशातील जाती धर्मातील प्रांतातील वेशभूषा यांचे देखावे दाखवून एकात्मतेचे दर्शन घडवण्यात आले. या मिरवणुकीत लेझीम व बँड पथकाने आपली चुणूक दाखवली. मिरवणूक महात्मा गांधी विद्यालयापासून सुरू होऊन प्रभात फेरी मार्गाने बस स्थानक, भोगावती नदी, पोस्ट गल्ली, चौधरी वाडा, गांधी चौक या मार्गाने आल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयात विसर्जन झाले.


कॉपी करू नका.