कविवर्य ना.धों.महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर !

साहित्य क्षेत्रातील चार, तर शेती-पाणी व्यवस्थापनातील दोन मान्यवरांची निवड 11 सप्टेंबरला मुंबईत पुरस्कार वितरण


जळगाव (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) : कवी आणि कादंबरीकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे रानकवी कविवर्य ना. धों. महानोर यांना शेती आणि पाणी या क्षेत्रांचीही विशेष आस्था होती. ना. धों. महानोर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे हे विविध पैलू लक्षात घेऊन भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या नावाने साहित्य तसेच शेती-पाणी क्षेत्रासाठी पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.

दरवर्षी एकूण सहा पुरस्कार दिले जात असून, त्यापैकी चार पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी, तर दोन पुरस्कार शेती-पाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात. सन 2026 च्या पुरस्कारांसाठी राज्यातील विविध भागांतून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त शिफारशींचा विचार करून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या संयुक्त निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली आहे.



साहित्य क्षेत्रातील पुरस्कारार्थी म्हणून अविनाश उषा वसंत – मुंबई, श्रीकांत साव – चंद्रपूर, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, विठ्ठल खिलारी सातारा यांची निवड करण्यात आली आहे. तर शेती पाणी व्यवस्थापनासाठी वैशाली पाटील दसनूर ता. रावेर, जि. जळगाव, सीमा क्षीरसागर कडवंची ता. जालना यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये अशोक जैन, जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिढे, अजित भुरे, रमेश जाधव, शंभू पाटील, दत्ता बाळसराफ यांचा समावेश आहे. हा पुरस्कार सोहळा दि.11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

पुरस्कारार्थ्यांचा परिचय –

साहित्य क्षेत्रातील पुरस्कारार्थी –

अविनाश उषा वसंत, मुंबई : अविनाश उषा वसंत यांचा ‘कविता ह्या हिणवलेल्या’ हा काव्यसंग्रह तसेच ‘पटेली’ व ‘ठसन’ या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत. वर्तमानपत्रे, मासिके आणि नियतकालिकांमधून ते साहित्य-भाषा, खेळ आणि पर्यावरण या विषयांवर सातत्याने लेखन करतात. गिरणगाव आणि मुंबई शहर हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

श्रीकांत साव, खुटाळा, चंद्रपूर : श्रीकांत साव यांचा ‘अभोगी रोजगाराचा हंगाम’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्याकडे सुमारे 15 हजार पुस्तकांचा संग्रह असून हा संग्रह त्यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला आहे. बेरोजगारीविषयी जनजागृती व्हावी यासाठी ते सातत्याने लेखन करीत असून, आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजभान जागृत करण्याचे काम करीत आहेत.

प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, बुलढाणा : प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी यांचा ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध असून ‘पाण्यावरील अक्षरे’ ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. भौतिकशास्त्राचे विद्यार्थी असलेले प्रेषित मानवी जीवनाकडे अत्यंत विचक्षण दृष्टीने पाहतात. जगताना आलेल्या अप्रिय आणि अटळ अनुभवांना नितळ व पारदर्शक करून काव्यात्म रूप देण्याची क्षमता त्यांच्या लेखनात दिसते. गंभीरपणे लेखन करणार्‍या या तरुण कवीचे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. ते बुलढाणा येथील भारत कनिष्ठ महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असून विविध नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत आहे.

विठ्ठल खिलारी, म्हसवड, सातारा : ऊसतोड कामगारांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षावर आधारित ‘सवळा’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या लेखनात ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनसंघर्ष, लोकसंस्कृती आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाला महत्त्वाचे स्थान आहे. लोकभाषा, बोली आणि ग्रामीण प्रतिमांचा प्रभावी वापर करून ते सामाजिक विषमता, उपेक्षा आणि अन्याय यांवर संवेदनशील भाष्य करतात. श्रमिकांच्या जगण्याचे वास्तववादी चित्रण तसेच सामाजिक परिवर्तनाची जाणीव आणि मानवी मूल्यांचा आग्रह त्यांच्या लेखनातून दिसून येतो.

शेती-पाणी व्यवस्थापनातील पुरस्कारार्थी
वैशाली पाटील, दसनूर, ता. रावेर, जि. जळगाव : कला शाखेच्या पदवीधर असलेल्या वैशाली पाटील यांनी बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे. वडिलांचे आणि त्यानंतर भावाचे निधन झाल्याने आई, वहिनी, लहान भाचा-भाची अशा पाच सदस्यीय कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी अविवाहित राहून संपूर्ण कुटुंब आणि शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पाणी व खत व्यवस्थापनावर विशेष लक्ष देत तंत्रज्ञान तसेच यांत्रिक अवजारांचा वापर करून त्यांनी गहू आणि केळीचे भरघोस उत्पादन घेतले. शेतीच्या माध्यमातून त्या दररोज 10 ते 15 मजुरांना रोजगार देत आहेत. वडिलांनी घेतलेले कर्ज फेडून त्यांनी कुटुंबासाठी टुमदार घरही बांधले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या वैशाली पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

सीमा क्षीरसागर, कडवंची, ता. जालना : कृषी पदवीधर असलेल्या सीमा क्षीरसागर यांच्यावर पतीच्या दुर्धर आजारपणामुळे कुटुंबासह शेतीची जबाबदारी आली. त्यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून डाळिंब आणि हंगामी पिकांचे यशस्वी व्यवस्थापन करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. द्राक्ष बागेतील फवारणीपासून ट्रॅक्टर चालविण्यापर्यंतची अनेक कामे त्या स्वतः करतात. म्हैस पालन आणि शिवणकामातूनही त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. गावातील इतर महिलांनाही त्या शिवण कामाबाबत मार्गदर्शन करतात. मेहनतीच्या बळावर त्यांनी द्राक्ष आणि डाळिंब शेतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती, म्हैस पालन, शिवणकाम आणि कौटुंबिक जबाबदार्‍या अशा विविध आघाड्यांवर त्या सक्षमपणे कार्यरत आहेत. ग्रामीण महिलांसाठी त्यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !