माणसातला देव माणूस म्हणजे हरीभाऊ : जनार्दन हरीजी महाराज
कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून माहितीपटाचे विमोचन
वढोदा : कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून स्व. हरीभाउंच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी तयार करण्यात आलेला 9 मिनिटांचा माहितीपट ( डॉक्युमेंटरी ) गुरुवार, 16 जुलै रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आश्रम वढोदा येथे एका छोटेखानी कार्यक्रमात स्व.हरीभाऊ जावळे यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करण्यात आला. कोरोनासदृश्य परिस्थितीमुळे कार्यक्रम अल्प उपस्थितीत घेउन फेसबुकवर लाईव्ह करण्यात आला होता. एक हजार लोक लाईव्ह या कार्यक्रमाला जोडले गेले होते.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, सुरेशशास्त्री मानेकर बाबा, भक्तिकिशोरदासजी शास्त्री आणि अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी भक्तिकिशोरदास शास्त्रीजी यांनी स्वरचित श्लोकात्मक स्मरण म्हणून एक प्रतिमा अमोल जावळे यांना सप्रेम भेट दिली. कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या माहिती पटाची संकल्पना स्व.हरीभाउंचे जनसंपर्क अधिकारी आणि अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळचे अध्यक्ष संदीप पाटील यांची आहे. 9 मिनिटांच्या माहितीपटात भाऊंचे वैयक्तिक, राजकीय, सामाजीक कारकिर्दीला न्याय देउ शकत नाही तरी हा छोटासा प्रयत्न भाऊंच्या स्मृतीना उजाळा मिळावा आणि भाउंचे कार्य,स्वभाव आणि विचार जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचावे या हेतूनेच हा माहितीपट तयार केल्याचे संदीप पाटील आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
वडिलांच्या संस्कार व विचारातून काम करणार : अमोल जावळे
माझ्या वडिलांनी जे संस्कार आणि विचार दिले त्याच मार्गावर चालून त्यांनी केलेली चांगली काम यापुढे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचाच्या माध्यमातून पुढे नेणार आहे .या कठीण काळात मला मानसिक आधार आणि बळ दिले ते सर्व संत महंत, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते,आणि सर्व मित्र परीवार यांच्या मी ऋणात राहू इच्छितो असे नमूद केले.
भाऊंचे काम पुढे सुरू ठेवणे हेच श्रद्धांजली : मानेकर बाबा
भाऊंनी राजकारणा राहून कुठलाही मळ लाऊन घेतला नाही. राजकारणाला अभिप्रेत असे कधीही वागले नाही. एकमेव नेते होते जो संतांच्या उपस्थितीतच आपला वाढदिवस साजरा करायचे. संत शक्यतो अश्या वाढदिवसांना जात नाही मात्र हरीभाऊंकडे सर्व जायचे त्यावरूनच त्यांचे व्यक्तीत्व समजते.जलक्रांतीच काम कुठलेही श्रेय स्वता न घेता केले. भाऊंचे काम पूढेही चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल अस मानेकर बाबांनी नमूद केल.
शेतकर्यांशी जुळलेला नेता : भक्तीकिशोरदास शास्त्री
भाऊंचा स्वभाव हा अध्यात्मिक होता.व्यस्त असतांनाही ते कायमच कथेत यायचे.माझ्या पाहण्यातील शेतकर्यांच्या इतका जवळ असलेला एकमेव नेता होता.या माहितीपटाने भाऊंच्या स्मृतींना उजाळा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही तर भाऊंच्या विचाराने प्रभावीत : जनार्दन हरीजी महाराज
हरीभाऊ सारख्यांच्या अस्तित्वाने माणूस आणि माणुसकी शिल्लक आहे हा विश्वास कायम जिवंत होता. त्यांच्या परीवाराला जेवढे दुख आहे तेवढेच दुख सर्व संप्रदायातील साधू संताना सुद्धा आहे. लोक आमच्या विचाराने प्रभावित होतात पण आम्ही सर्व संत भाऊंच्या स्वभावाने,गुणाने आणि विचाराने प्रभावित होतो. थेंब अमृताची जलक्रांती ही सर्व संकल्पना भाऊंची होती पण भाऊंनी सर्व श्रेय साधू संतांना दिले.आम्ही फक्त पाठबळ दिल पण सिंहाचा वाटा फक्त भाऊंचाच होता. स्वतःच श्रेय दुसर्याला देणारा असा दुसरा नेता अजुन तरी आम्ही पाहिला नाही आणि म्हणूनच कोणी कितीही प्रयत्न केले तरी हरीभाऊ फक्त हरीभाऊच होते. विचार मंचाच्या माध्यमातून शेती, माती,पाणी या विषया संदर्भात हरीभाऊंच्या स्वप्नाप्रमाणे जे जे करता येइल तेते भविष्यातही आपण सगळे मिळून करु हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन तर श्लोकाचे वाचन ज्ञानेश्वर घुले यांनी केले. आभार मयुर कोल्हे यांनी मानले. या प्रसंगी नारायण चौधरी, ललित बोंडे, पराग पाटील, चेतन चौधरी उपस्थित होते.

