प्रवाशांच्या सुरक्षेसह ड्रग्ज माफियांचा काटेकोर बंदोबस्त

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची धडक कामगिरी : तस्करांचे दणाणले धाबे


भुसावळ (21 एप्रिल 2025) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल चोरट्यांसाठी कर्दनकाळ ठरले आहे. प्रवाशांची वा त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा असो की, हरवलेल्या बालकांचा शोध असो सुरक्षा बलाने दरवर्षी सरस कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे तस्करीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने धडक कारवाई केल्याने सुरक्षा बलाचा डीआरएम प्रशासनाने गौरव केला आहे.

दहा स्थानक ‘अ’ श्रेणीत
भुसावळ रेल्वे विभागातील अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, बर्‍हाणपूर, चाळीसगाव, जळगाव, खंडवा, शेगाव, खामगाव, मनमाड अशी दहा स्थानके अ श्रेणीतील तर मलकापूर, देवळाली, पाचोरा व मूर्तिजापूर ही श्रेणीतील स्थानके आहेत.

दंड वसुलीचा विक्रम
2024 या वर्षात आरपीएफने 7.55 लाख रुपयांचा दंड वसूल करत रेल्वे मालमत्तांचे रक्षण करून 169 जणांना अटक केली तर रेल्वे मालमत्तेवरील हल्ले किंवा प्रवाशांच्या चोरीच्या तक्रारी असो आरपीएफने 2022 मध्ये रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी 236 जणांना अटक करीत 9.3 लाख रुपयांचा दंड वसूल केला. 2023 मध्ये ही संख्या वाढून 264 संशयीतांना अटक झाली तर 2024 मध्ये 7.55 लाख रुपयांचा दंड वसूल करीत 160 जणांना अटक करण्यात आली.

गांजा तस्करांवरही कारवाई
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष ऑपरेशन सुरू करण्यात आले. 2024 मध्ये 219 प्रकरणात 274 संशयीतांना अटक झाली. महिलांच्या सुरक्षेसाठी मेरी सहेली मोहिमेद्वारे 2024 मध्ये एक हजार 457 प्रकरणांच्या माध्यमातून तीन लाख 56 हजारांचा दंड वसूल झाला तर वर्षभरामध्ये 164.6 किलो गांजा जप्त करीत सहा आरोपींना अटक करण्यात आली.

तिकीट दलालांवर कारवाई
बेकायदेशीरपणे डब्यांमध्ये प्रवेश करणार्‍या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यातसोबत बेकायदेशीर तिकीट विक्री करणार्‍या दलालांविरोधात मोहिम राबवून वर्षभरात आठ हजार 553 संशयीतांना अटक करण्यात आली आणि कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला. अत्याचार, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वर्षभरात 120 गुन्ह्यांची उकल करण्यात आली. आरपीएफने वृद्ध, महिलांना मारहाणीची प्रकरणे हाताळण्यासाठी गरीमा ऑपरेशन सुरू केले. यात 2024 मध्ये 54 लोकांना नागरिकांना वाचवण्यासाठी मदत केली. लिटल एंजल्स अर्थात हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांना वाचवण्यासाठी मोहिमेत 286 मुले वाचवण्यात आली. रेल्वे आरपीएफने तीन वर्षांत अनुक्रमे 247, 305 आणि 304 ठेवी परत केल्या असून त्याचे मूल्य 57 लाख ते 1.21 कोटी रुपये होते. दरम्यान, या सर्व कारवाया भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या तर रेल्वे डीआरएम ईती पांडे यांनी कारवाईचे कौतुक केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !