उन्हाळी सुटीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय
Important decision regarding the reopening of schools in the state after the summer vacation मुंबई (10 जून 2026) : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरू करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होतील तर राज्यभरातील शाळा 15 जून रोजी सुरू होणार आहेत. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील शाळांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी तसे संकेतही दिले होते. त्यांनी विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू होतील, असा अंदाज वर्तवला होता मात्र आता विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हटले आहे आदेशात?
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भात उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाला होता. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. काही दिवसांपूर्वीच ब्रह्मपुरीत नुकतीच 47.2 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.
परिणामी हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी ’रेड अलर्ट’ जारी केला तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. हवामान खात्यानेही विदर्भातील नागरिकांना हिट व्हेवच्या काळात काळजी घेण्यासाठी सूचना जारी केल्या होत्या. उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.
विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. परिणामी विदर्भातील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे केवळ विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 22 जूनपासून सुरू होतील. 22 ते 30 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरतील. 1 जुलैपासून विदर्भातील शाळा नियमित वेळेत भरतील. उर्वरित राज्यातील शाळा 15 जूनपासून नियमित वेळेत भरतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.


