कोरोनामुळे परीस्थिती भीषण : सरकारला कठोर निर्बंधाशिवाय पर्याय नाही : शरद पवार


मुंबई : कोरोनाचा काळ कसोटीचा काळ असून या काळाला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आल्याने राज्यातील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

धैर्याने सामोरे जाण्याचा दिला सल्ला
कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परीस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पवार यांनी म्हटलं.


कॉपी करू नका.