मुंबईत शाळा बंद तर राज्याबाबत झाला हा निर्णय…!


मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढणारा संसर्ग आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही वाढत असल्याने खबरदारी म्हणून दहावी-बारावीचे वर्ग वगळून, पहिली ते नववी आणि अकरावीच्या सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे. या कालावधीत या इयत्तांचे शिक्षण पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. ठाणे महापालिकेनेही शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, राज्यातील अन्य शहरांमधील शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

मुंबईत रुग्ण संख्या वाढली
राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवत असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी जाहीर केले. ठाणे, पालघर जिल्ह्यातील, नवी मुंबइतील शाळाही 31 पर्यंत बंद राहतील. रायगडमध्ये रूग्णसंख्येचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.





उच्च न्यायालयाचे आभासी कामकाज
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींच्या प्रशासकीय समितीने जानेवारी अखेरपर्यंत किंवा पुढील आदेश देईपर्यंत न्यायालयीन कामकाज आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात निर्बंध कडक होणार
पुणे शहरात 27 डिसेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. बधितांपैकी 80 ते 85 टक्के रुग्ण दोन्ही डोस घेतलेले आहेत. या बाधितांमध्ये अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे शहरात निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील 2949 शाळा राहणार बंद
गेल्या आठवड्यात शंभरच्या घरात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या जानेवारीत एकदम दोन हजारच्या घरात गेल्याने धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील एक हजार 620 माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषदेच्या एक हजार 328 प्राथमिक शाळा अशा दोन हजार 848 शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी घेतला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार आहे.

महापालिकांची खबरदारी
राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिका क्षेत्रात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले असताना मुंबईतील कोरोना रुग्ण आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णवाढ होताना लहान मुलांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

शाळांबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार : शिक्षणमंत्री
स्थानिक पातळीवर संक्रमणाची परीस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आधीच देण्यात आले असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !