अजित पवारांचा विमान अपघात : कॉकपीट संभाषणाबद्दल तपास यंत्रणेने दिली ‘ही’ माहिती
Ajit Pawar’s plane crash: Investigation agency gives ‘this’ information about cockpit conversation मुंबई (17 फेब्रुवारी 2026) : अजित पवारांसह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकीय गोटातून विविध चर्चा अद्यापही सुरू आहेत. त्यातच विमान अपघात तपास यंत्रणेकडून या अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाला असून ही साधने बराच काळ ज्वाळांमध्ये राहिल्याने त्यांना मोठे नुकसान झाले त्यामुळे तपास प्रक्रियेला काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, असे असूनही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे यंत्रणेने नमूद केले आहे. तर्कवितर्कांना बळी न पडता अधिकृत तपासावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
काय आहे नेमके निवेदन ?
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, विमानात दोन स्वतंत्र नोंदणी साधने होती. त्यापैकी एकातील एल-3 संभाषणाशी संबंधित माहिती यशस्वीरित्या प्राप्त करण्यात आली मात्र कॉकपीटमधील संभाषण नोंदवणार्या साधनावर सखोल तांत्रिक परीक्षण सुरू आहे. हे उपकरण हनीवेल कंपनीनिर्मित असल्याने संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत मागविण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार, पुराव्यावर आधारित तपास करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तपास प्रक्रियेबाबत चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.

चुकीच्या अफवा पसरवू नये
तपास यंत्रणेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय निकषांनुसार आणि पुराव्यावर आधारित पद्धतीनेच संपूर्ण तपास केला जात आहे. नुकसानग्रस्त नोंदणी साधनांमधून शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित तज्ज्ञांची मदत घेऊन तांत्रिक परीक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चुकीच्या अफवा पसरवू नयेत आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. एकूणच, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नोंदणी साधनांना झालेल्या नुकसानीमुळे तपासाला आव्हाने उभी राहिली असली तरी अधिकृत यंत्रणा सखोल तपास करत असल्याचा दावा करत आहे.
बारामती विमानतळावर उतरतानाच विमानाचा अपघात
ही दुर्घटना 28 जानेवारी रोजी घडली. त्या दिवशी अजित पवार सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर उतरतानाच विमानाचा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली.







