बारावी परीक्षेतील मराठीची प्रश्नपत्रिका सदोष : प्र.ह.दलाल यांचा दावा
Marathi question paper in 12th exam is flawed: Q. H. Dalal claims भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : राज्यात झालेल्या इयत्ता बारावी मराठी प्रथम भाषेची कृतीपत्रिका (प्रश्न पत्रिका) यावर्षी सुद्धा परीक्षा मंडळाने सदोषच काढलेली असल्याचा दावा प्र. ह.दलाल यांनी केला आहे. चुकीची प्रश्नपत्रिका काढण्याचा वसा जपणार्या परीक्षा मंडळाचे त्यांनी उपहासाने अभिनंदनही केले आहे!
काय आहे दावा ?
प्रसिद्धी पत्रकात यांनी म्हटले आहे की, पहिल्याच पानावर ठळक अक्षरात कृतिपत्रिका असे लिहिले असून काही सूचना दिलेल्या आहेत.त्यातील क्रमांक एकमध्ये आकलन व कृती हे दोन शब्द वेगवेगळे लिहिले आहेत. वास्तविक आकलनकृती हा एकच शब्द आहे शिवाय कृती हा शब्द एकदा कृती तर दुसर्यांदा कृति असा लिहिला आहे मग योग्य शब्द कोणता समजावा? विद्यार्थ्यांकडून मात्र शुद्ध शब्दाची आपला करतात.

सूचना क्रमांक 2 मध्ये ,लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष दया वे. ही सूचना दिलेली आहे. खेदाची बाब अशी की, हे वाक्यच मुळात लेखन नियमानुसार नाही! हे तथाकथित तज्ज्ञ मंडळींना माहीत कसे नाही? दुसर्यास सांगे….. स्वतः लेखन नियमानुसार लेखन करायचे नाही आणि विद्यार्थ्यांकडून मात्र त्याची अपेक्षा करायची ह्या बेजबाबदारपणा काय म्हणावे? आपली प्रश्नपत्रिका राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचते आणि सर्व तेच प्रमाण मानतात ह्यादृष्टीने ह्या विद्वान मंडळीची जबाबदारी किती मोठी आहे ह्याचं सुद्धा भान नाही मग गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा तरी का करतात?
मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा यावा म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, पाठ्यपुस्तक, परीक्षा मंडळ इ सर्वांनीच प्रामाणिकृत मराठी वर्णमाला,अक्षर माला व अंकांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सुस्पष्ट आदेश राज्य शासनाने प्रथम दिनांक 9 नोव्हेंबर 2009 आणि नंतर 11 नोव्हेंबर 2022 रोजी काढलेले आहेत मात्र शासनाच्याच अधीन असलेले शालांत परीक्षा मंडळ सातत्याने चक्क सोळा वर्षांपासून त्या आदेशाला तिलांजली देत आहे! आणि विद्यार्थ्यांकडून तुम्ही कोणत्या लेखन नियमांची अपेक्षा करता?
शासनाने जे चुकीचे ठरविले आहे त्याला तुम्ही बरोबर म्हणणार का? चुकीच्या नियमांचा प्रसार करणार का? प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत मी गेल्या अनेक वर्षांपासून सतत लिहित आहे पण पालथ्या घड्यावर पाणी! असो. आता ह्या कृतिपत्रिकेत काय ते बघा.. गद्य, पद्य असे प लिहिता गदय, पदय, रीश लिहिले आहेत व ते लेखननियमा नुसार नाही. कारण नियम असे म्हणतोय, द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास व त्यापुढे य आल्यास द्य असे लिहावे दय असे लिहू नये.तसेच सदर कृतिपत्रिकेत सर्वत्र ,विठ्ठल,सुद्धा, मुद्दा,द्वंद्व हे व असे जोडाक्षर न लिहिता चुकीच्या म्हणजे सूदद, मुद् दा , पदधत असे तोडक्षर पद्धतीने लिहिले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे श आणि ल ही अक्षरे जुन्या नियमबाह्य पद्धतीने गाठयुक्त श आणि पाकळीयुक्त हिंदीत लिहितात तसा ल लिहिला आहे. व्याकरण विभागातील प्रश्न खूपच सोपे म्हणजे 8 वी/ 9 वी च्या विद्यार्थ्यांना सहज येतील असे आहे मराठी भाषा अध्ययन व अध्यापन यांची उद्दिष्टे ,प्रश्नांचे स्वरूप, ह्या. मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी जास्तीत जास्त विद्यार्थी सहज पास होतील याकडेच अधिक लक्ष दिल्याचे जाणवते उपयोजित मराठी ह्या विभागात एखादी मुलाखत/ अहवाल किंवा प्रत्यक्ष वृत्तलेखन लिहायला सांगणेही चांगले झाले असते असे मला वाटते. व्याकरण विभागात ..तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला ह्या वाक्यात चांगले ह्या ऐवजी मधुर बोला,सत्य बोला अशी अधिक अर्थपूर्ण विशेषण वापरता आले असते चांगले ह्याचा निश्चित,नेमका अर्थबोध होत नाही तो सर्रास वापरणारा शब्द आहे विद्यार्थ्यांचे शब्द भंडार समृद्ध करण्यासाठी अनेक समानार्थी शब्द त्यांना मात असावे हीच सदिच्छा. हा लेख प्रपंच केवळ त्रुटी,दोष दाखविण्यासाठी लिहिलेला नाही तर व्यवस्था निर्दोष असावी,आपल्या जबाबदारीचे भान असावे .विद्यार्थी आपणास आदर्श,/ प्रमाण मानत असते त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणच मिळायला हवे व ते भाषणातून नाही तर कृतीतूनच होईल त्याच साठी हा अट्टाहास!







