ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह !
एरंडोल, चाळीसगाव, यावल, तालुक्यात इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार आहे. प्रत्येकी 100 क्षमतेची मुले व मुलींचे एक असे एकूण सहा वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहासाठी 9200 क्षेत्रफळाची भाडेतत्त्वावर इमारत देऊ इच्छिणार्या मालकांनी, व्यक्तींनी 15 जानेवारीपर्यंत समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
या जिल्ह्यात वस्तीगृह कार्यरत
सामाजिक न्याय विभागाचा 15 जून 2021 च्या शासन निर्णयान्वये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्यात आलेली आहे. यात मुलांसाठी 41 व मुलींसाठी 41 अशी एकूण 82 (प्रत्येकी 100 क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यापैकी प्रथम टप्प्यात मुलांसाठी – 10 व मुलींसाठी 10 अशी एकूण 20 (प्रत्येकी 100 क्षमतेची) वसतीगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ही वसतीगृहे ही औरंगाबाद व नाशिक या विभागातील अहमदनगर, जालना, आणि बीड या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत.






62 वस्तीगृह सुरू होणर
आता उर्वरीत 31 मुलांची व 31 मुलींची अशी एकूण 62 शासकीय वसतीगृहे सुरु करणेबाबत प्रस्तावित असून त्यापैकी जळगांव जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह एरंडोल, चाळीसगांव, यावल, या ठिकाणी 1 मुलांचे व 1 मुलींचे (प्रत्येकी 100 क्षमतेची) असे प्रत्येकी 2 वसतीगृह सुरु करणेकरीता (शासन मंजुरीच्या अधिन राहून) इमारत भाडेतत्वावर घेणेसाठी इमारत बांधकाम 9200 क्षेत्रफळ (चौ.फुट) सर्व सोयी-सुविधायुक्त शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यालय/महाविद्यालय पासून जवळ असलेली इमारत भाडेतत्वावर देणेसाठी उपलब्ध असल्यास 13 मार्च, 2023 च्या शासन परिपत्रकातील अटीच्या अधीन विहित नमुन्यात आपले इमारत भाडेतत्वावर देणेबाबतचा प्रस्ताव अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगांव या कार्यालयास सादर करण्यात यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


