भावली धरण परिसरात पर्यटकांवर हल्ला : पोलिसांनी नऊ आरोपींची काढली काढली धिंड


ईगतपुरी (बुधवार, 15 जुलै 2026) : भावली धरण आणि रिसॉर्ट परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील भागवत कुटुंबावर सोमवारी सायंकाळी काही स्थानिक तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. महिलेची छेड काढणार्‍या तरुणांना जाब विचारल्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकच्या साहाय्याने कुटुंबावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती.

सात किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड
हल्ल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी भागवत कुटुंबाच्या कारचा तब्बल सात किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. घोटी टोलनाक्याजवळ कार अडवून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी महिलेचा विनयभंग करण्यात आला, तसेच तिचा मोबाईल आणि सोन्याची साखळी हिसकावून आरोपी पसार झाले. जीव वाचवत कुटुंबाने अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

गंभीर गुन्ह्यांखाली नऊ जणांना अटक
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास इगतपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

फरार आरोपींचा शोध सुरू
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी सांगितले की, या प्रकरणातील एका फरार आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. पर्यटकांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !