गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याने राज्यात खळबळ


मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावल्यानंतर गृहमंत्र्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती शिवाय सरकारवरदेखील टिका होत होती. यशा प्रकरणावर अ‍ॅड.जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआयला 15 दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे. दरम्यान, शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे देखील वाचा : दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचे संकेत 

गृहमंत्री म्हणाले, पदावर राहणे योग्य वाटत नाही
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मी गृहमंत्रीपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या या योग्य वाटत नाही त्यामुळे, मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे, असे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तसेच, मला गृहमंत्री या पदावरुन कार्यमुक्त करावे, असेही त्यांनी म्हटलंय.

100 कोटी वसुलीचा केला होता आरोप
सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकार्‍यांना दरमहा 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत नमूद आहे. सरकारी वकिलांनी ही याचिका दाखल करून घेण्यावर आक्षेप घेतला. सिंग यांनी त्यांची बदली करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली. त्यांना आयुक्तपदावरून गृहरक्षक दलाची जबाबदारी दिल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली, असे नमूद केले.

 


कॉपी करू नका.