राज्यात तेलबिया वाण विकसीत करण्यासाठी कृषी विद्यापीठांना सूचना


केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे : ममुराबादला शेतकरी मेळावा

फैजपूर : देशाच्या खाद्यतेल आयातीवर मोठा खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्रासह देशात तेलबियांचे उत्पादन दुप्पट करणे आवश्यक आहे. त्यासाठी कमी पावसात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्‍या तेलबियांचे वाणं विकसीत करा, अशा सूचना महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापिठांना दिल्या आहेत त्यानुसार काम सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार हरीभाऊ जावळे यांनी दिली. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात 1 नोव्हेंबरला आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.शरद गडाख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.सुदाम पाटील, कृषीतज्ज्ञ डॉ.वसंतराव महाजन, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.हेमंत बाहेती, एरंडोल येथील कृषीभूषण समाधान पाटील, जळगावच्या केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.एन.बी.शेख, माचला (ता.चोपडा) येथील डॉ.रवींद्र पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र कृषी परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. जिल्हाभरातील शेतकरी व मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, मेळाव्यात हरभरा लागवडीवर ममुराबाद केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ.रमेश भदाणे यांनी हरभरा लागवडीचे तंत्रज्ञान, कापूस पैदासकार डॉ.संजीव पाटील यांनी अतिपावसानंतर कपाशी पिकाची कशी काळजी घ्यावी? तर विषयतज्ज्ञ डॉ.स्वाती कदम यांनी रब्बी ज्वारी लागवडीवर माहिती दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !