सेवक जागा असल्याने ग्रामीण विकासास हातभार


खासदार उन्मेश पाटील : भुसावळात संजीव निकम यांचा सत्कार

भुसावळ : केंद्र सरकार असो वा राज्य सरकार जनतेच्या हिताचे नवनवीन निर्णय आणि योजना घोषित होतात. त्या योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यात लोकप्रतिनिधी बरोबर शासनाचा प्रतिनिधी म्हणून मोठी भूमिका ग्रामसेवकांची असून त्यांच्यातला सेवक जागा असल्याने आजही ग्राम पातळीवर शेवटच्या घटकाला विकासाचा लाभ मिळण्यास मदत होत असल्याचे मत केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले. भुसावळ येथील टेक्निकल शाळेजवळील प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या अभिष्टचिंतन आणि ग्रंथतुला कार्यक्रम प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार संजय सावकारे यांनी ग्रामसेवकांच्या काम करण्याच्या तळमळीचे कौतुक करीत संघटनेला तसेच सत्कारार्थी संजीव निकम यांना शुभेच्छा दिल्यात.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी एकनाथराव ढाकणे, प्रशांत जामोदे, सुचितजी घरत, राज्याचे प्रसिद्धी प्रमुख बापू आहिरे, ग.स संचालक सुनील पाटील, ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, जिल्हा सरचिटणीस संजय भारंबे, उपाध्यक्ष अशोक खैरनार, महिला जिल्हा आघाडी उपाध्यक्ष रुपाली साळुंखे, जिल्हा कोषाध्यक्ष के.डी.पाटील, भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, चाळीसगाव बाजार समितीचे सदस्य अ‍ॅड.राजेंद्र सोनवणे, पदाधिकारी राकेश कोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील सर्व सन्माननीय तालुका अध्यक्ष / सचिव ,तालुका कार्यकारणी तसेच सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य व ग्रामसेवक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतमूर्ती राज्यकोषाध्यक्ष संजीव निकम यांचा सुवर्ण महोत्सवी 50वा वाढदिवसानिमित्ता अभिष्टचिंतन कार्यक्रम रावेर, यावल, भुसावळ मुक्ताईनगर तालुका शाखा व जिल्हा युनियनच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 ते 1 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर व स्नेहभोजनाचे आयोजन कण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले. आणि निकम साहेबांची यावेळी भगवद्गीता-ग्रंथ तुला करण्यात आली.

अडचणी सोडवण्यासाठी तत्पर
खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले ग्रामसेवक संघटनेने फक्त आपली संघटनाच बांधली नसून एकमेकांची मने देखील जोडलेली आहे. एकमेकांच्या संपर्कात असल्याने ग्रामसेवक बंधू भगिनी आपले सुख दुःख एकमेकांशी वाटून मन मोकळा संवाद ठेवतात यातून अधिकारी कर्मचारी यांना आपल्या कामात वेगळी ऊर्जा मिळते. यातून अनेक ग्रामसेवकांनी कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे सांगून ते म्हणाले की ग्रामसेवकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !