खासदार आमच्यासोबतच : महायुतीत जाण्याचा प्रश्नच नाही : शरद पवार
मुंबई (14 जानेवारी 2025) : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार महायुतीत जाण्याबाबत आग्रही आहेत, अशी चर्चा सुरू आहे का? याबाबत आपले व्यक्तिगत मत काय? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, यात कसले व्यक्तिगत आले? आमच्या एकाही खासदाराचे वेगळे मत नाही. माध्यमांनी असा जावई शोध कुठून लावला, हे कळायला मार्ग नाही.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मविआमधील पक्षात खटके उडू लागल्याचे चित्र दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या प्रश्नावर आता शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली टीका, इंडिया-मविआ आघाडीची सद्यस्थिती आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांवर शरद पवार यांनी उत्तरे दिली आहेत.

इंडिया आघाडी लोकसभेसाठी
इंडिया आघाडीबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. दिल्ली विधानसभेला आप आणि काँग्रेस विरोधात लढत असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीसाठी जेव्हा आम्ही एकत्र बसलो होतो, तेव्हा लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याबाबत चर्चा झाली होती. पण राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका एकत्र लढण्याबाबतची चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीने वृत्तपत्र याची नोंद घेत आहेत, त्यावरून राष्ट्रीय पातळीवरील भूमिकांमध्ये एकत्र राहण्याची भूमिका घेतली पाहीजे, असे वाटत आहे. आमच्या पातळीवर असा निर्णय घेऊ. राज्याच्या बाबत आघाडी करायची की नाही? याबाबत येत्या आठ – दहा दिवसांत तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील. राज्यात काही एकत्रित भूमिका घेता येईल का? याबाबतही निर्णय घेऊ.
एकेकाळी तडीपार झालेले गृहमंत्री
दरम्यान शिर्डीतील भाजपाच्या मेळाव्यात बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते. आपल्या शेजारचे राज्य गुजरात आहे. गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. त्यांच्यापैकी अनेकांची नावे घेता येतील. या सगळ्या प्रशसकांचे वैशिष्ट्य होतं, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते, असे सांगून शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.
