कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समिती सदस्यांनी घ्यावा पुढाकार : पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे
यावल पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात

यावल (6 जून 2025) : शहरात आगामी दोन दिवसात शिवराज्याभिषेक व मुस्लिम समाज बांधवांचा बकरी ईद हा सण आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांनी जास्तीत-जास्त आपला वेळ सार्वजनिक ठिकाणी द्यावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी. कुठे काही गैरप्रकार घडत असल्यास तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांसमवेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले. ते गुरुवारी यावल पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावल येथील पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी शुक्रवारी साजरा केला जाणार्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा तसेच शनिवारी साजरी केल्या जाणार्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली.
आगामी दोन दिवस महत्त्वाचे
शांतता समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले की, आगामी दोन दिवस महत्त्वाचे आहे आणि या दोन दिवसात शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी जास्तीत-जास्त वेळ दिला पाहिजे. आपल्या परिसरात, आपल्या भागात, शहरात कुठे काही गैरप्रकार घडत तर नाहीये ना ?, याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. पोलीस प्रशासनाशी सतत संपर्कात राहून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिया राजेंद्र कर्डिले, डॉ.आर.सी.भगुरे, शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, पुंडलिक बारी, भगतसिंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष असलम खान, शेख अलीम सह आदींची उपस्थिती होती.
कायदा हातात न घेता पोलिसांना द्या माहिती
या बैठकीमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा त्याचप्रमाणे बकरीद ईद ही शांततेत साजरी केली जावी असे आवाहन पोलिसांनी केले. शांतता समितीच्या बैठकीत झालेली चर्चा संदर्भात शांतता समितीच्या सदस्यांनी आपापल्या परिसरातील तरुणांना अवगत करावे. कुठेही काही गैरप्रकार घडल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती दिली जावी अशा सूचना याप्रसंगी करण्यात आल्या. शांतता समितीच्या बैठकीच्या शेवटी यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांच्या निधनापश्चात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शांतता समिती सदस्यांचे शांततेचे आवाहन व सूचना
शांतता समितीच्या बैठकीमध्ये नगरपालिका प्रशासन, विद्युत वितरण कंपनी यांच्या संदर्भात देखील सण उत्सवाच्या काळात अनेक सूचना असतात मात्र शांतता समितीच्या बैठकीला नगरपरिषदेचे प्रतिनिधी व विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नाहीये, म्हणून यापुढे त्यांना पत्र व्यवहार करून शांतता समितीच्या बैठकीत बोलावले जावे, अशी सूचना पुंडलिक बारी यांनी मांडली.
दोन्ही समाज शांतताप्रिय
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून सातत्याने दोन समाजात तणाव निर्माण होणारे व्हिडिओ फोटो व्हायरल केले जातात आणि त्यामुळे अनेक वेळा तणाव निर्माण होतो. यावल शहरात अशा अफवांवर शक्यतो विश्वास ठेवला जात नाही. शहरातील व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव हा कायद्याला मानणारा आहे व तो कायद्याचे पालन करेल या सणात कुठेच चुकीचा प्रकार घडणार नाही. शहरात व तालुक्यातील हिंदू मुस्लिम दोन्ही समाज हे शांतता प्रिय आहेत, असे हाजी शब्बीर खान मोहम्मद खान यांनी सांगितले.
उत्सव शांततेत साजरे करणार
शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. सर्वधर्मीय समाजबांधव एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन येथे शांततेत सण उत्सव साजरे करत असतात व आगामी सण-उत्सव देखील शांततेत साजरे करतील, असे प्रसंगी शांतता समितीचे सदस्य भगतसिंग पाटील यांनी सांगितले.
