सांघिक कार्यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश
रावेरला कर्मचार्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव
रावेर : गेल्या पाच महिन्याृंपासून कोरोनाशी लढा देत नागरीकांमध्ये खर्या अर्थाने प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी केलेल्या काम व जनजागृतीमुळेच तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले आहे. सर्वच कर्मचार्यांनी मनापासून जबाबदारी पार पडल्याने याचे श्रेय सर्वांचे असून हे सांघिक यश आहे, असा विश्वास प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी व्यक्त केला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना काळात येथील तहसील कार्यालय व तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नायब तहसीलदार कविता देशमुख, सी.जी.पवार, एन.जे.खारे, सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे उपस्थित होते. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणार्या महसूल विभागाच्या कर्मचार्यांचा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शहरात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविल्याबद्दल सर्वप्रथम पालिका मुख्याधिकारी लांडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, अव्वल कारकून, लिपिक व इतर कर्मचार्यांसह तालुक्यातील सर्व तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करण्यात आला.


