जळगाव महिला वस्तीगृहात पुरूषांना प्रवेश नाही : गृहमंत्री अनिल देशमुख
तक्रारीत तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष : 41 जणांच्या नोंदवल्या साक्ष
मुंबई : जळगाव येथील आशादी महिला वस्तीगृहासंबंधी घटनेची सहा वरीष्ष्ठ महिला अधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून त्यात तथ्य नसल्याचा अहवाल दिला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. गृहमंत्री देशमुख म्हणाले, काल या महिला वसतीगृहाबाबत वृत्त प्रकाशित झाल्याने त्याचबरोबर विधानसभेत सदस्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर चौकशीसाठी नेमलेल्या सहा महिला अधिकार्यांनी या वसतीगृहातील महिलांशी चर्चा केली. 41 साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या वस्तीगृहात 17 महिला वास्तव्यास असून त्यांच्यासोबत महिला अधिकार्यांनी चर्चा केली. महिला वस्तीगृह असल्याने पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. तक्रारदार महिलेच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही, असा अहवाल या महिला अधिकार्यांनी दिल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
बदनामीकारक माहिती प्रसारीत करणे योग्य नाही
या प्रसंगी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, या वस्तीगृहात पीडीत आणि घटस्फोटीत महिला राहतात. त्यांच्यासंदर्भात अशा प्रकारे बदनामीकारक माहिती प्रसारीत करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील या घटनेत तथ्य नसल्याचे यावेळी सांगितले.

