टंचाईचे चटके : जळगाव जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा
जळगाव : मे महिन्यात यावर्षी पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात चार तालुक्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून टँकरमुक्त झाला होता परंतु यावर्षी फेब्रुवारीपासुनच उन्हाळ्याची तीव्रता जाणवण्यास सुरुवात झालेली असून सध्यस्थितीत सरासरी तापमान 46 अंशावर गेलेले आहे. जिल्ह्यात 45 अंशादरम्यान असलेल्या तापमानामुळे बर्याच ठिकाणी ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठला आहे.
या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
दुसरीकडे प्रकल्पातील पाणीपातळी देखील बर्याच प्रमाणात कमी झालेली आहे. परिणामी बर्याच ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात तीन, भडगाव दोन, भुसावळ आणि पारोळा प्रत्येकी एक असे 7 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जुलै 2019 नंतर सलग तीन मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासली नाही. परंतु जिल्हयात त्यामानाने दोन वर्षांनंतर यावर्षी प्रथमच ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी 7 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण योजना फलदायी
जिल्ह्यात 2017-18 दरम्यान अत्यंत कमी पाऊसमानामुळे सुमारे 225 ते 255 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, किशोरराजे निंबाळकर यांच्या कार्यकाळात जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या संकल्पनाद्वारे धरणातील अथवा नदीनाल्यामधील देखील गाळ काढण्यात आला. तर ठिकठिकाणी पावसाळ्यात डोंगर उतारावरील वाहून जाणारे पाणी माती बांध, सिमेंट बांध, चर खोदून अडविण्यात आले पर्यायाने विहिरीची तसेच जमिनीतील भूगर्भाची पाणीपातळी उंचावण्यास मदत झाली होती.







