भुसावळात 50 तक्रारदारांना मिळाला जागेवरच न्याय

तक्रार निवारण दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद : न्याय मिळताच तक्रारदारांच्या डोळ्यातून तरळले अश्रू


भुसावळ : एकूलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर नातवाचे तोंड सून पाहू देत नाही, विश्वासाने दिलेला पैसा जवळच्यांनी परत केला नाही, जागेवरील वादातून हाणामारी झाल्यानंतरही दोषी कारवाई नाही, नवर्‍याशी बायको प्रेमाने वागत नाही, सासरची मंडळी सातत्याने सुनेचा छळ करते यासह एक ना अनेक प्रकारच्या समस्यांबाबतच्या तक्रारी पोलिस प्रशासनाला गेल्या काही महिन्यात प्राप्त झाल्या होत्या मात्र या तक्रारींचा निपटारा होत नव्हता. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून शनिवारी आयोजित तक्रार निवारण दिनात 50 तक्रारींचा जागेवरच निपटारा झाला तर 18 तक्रारींचा तिढा येत्या चार दिवसात सुटणार आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारी जागेवर सुटल्यानंतर तक्रारदारांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाल्याने त्यांनी पोलिस प्रशासनासह पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे मनपूर्वक आभार मानले तर फसवणुकीची रक्कम लाखोंची असतानाही काल-परवापर्यंत नाही देत म्हणणार्‍यांनी चक्क तक्रार निवारण दिनात रक्कम देण्याची लेखी हमीच लिहून दिल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. खर्‍या अर्थाने जिल्हा पोलिस अधीक्षकांची संकल्पना यानिमित्त सार्थकी ठरली.

तक्रार निवारण दिनात 50 तक्रारींचा निपटारा
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आयोजित तक्रारदिन कार्यक्रमात भुसावळ तालुक्याच्या 18, भुसावळ शहरच्या 25 तर बाजारपेठ 25 पैकी एकूण 50 तक्रारींचा निपटारा करण्यात यश आले तर येत्या चार दिवसात उर्वरीत 18 तक्रारींचे निरसन केले जाणार आहे. यावेळी बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांच्यासह तपासी अंमलदार, अर्जदार, संशयीत सर्वांनाच सकाळी दहा वाजता बााजरपेठ पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले होेते. यावेळी अर्जदाराला स्वतंत्र बोलाविण्यात येवून शांततापूर्वक त्यांचे म्हणणे, तक्रारीचे स्वरूप, तक्रार अर्जाचा प्रलंबित कालावीध जाणून घेवून जागेवर तक्रारी सोडवण्यात आल्या.


जिल्हा पोलिस अधीक्षकांची संकल्पना यशस्वी
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेनुसार आयोजित या तक्रार निवारण दिनात शनिवारी 50 तक्रारींचा निपटारा करण्यात यश आले तर 18 तक्रारींबाबत येत्या चार दिवसात निर्णय देवून तक्रारदाराचे समाधान केले जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. यापुढे पोलिस ठाण्यात येणार्‍या प्रत्येक तक्रारदाराला सन्मानाची वागणूक दिली जाईल शिवाय त्यांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करण्याबाबत अधिकार्‍यांना सूचना करण्यात येतील, असेही पोलिस उपअधीक्षक म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !