मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोलभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे अकलूदला मोफत मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
यावल (17 मे 2026) : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जनसामान्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोलभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे अकलूद, ता.यावल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत, या सामाजिक जाणिवेतून या जनहित उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगावात होणार विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया
साई बाबा मंदिर, अकलूद येथे आयोजित शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. मोतीबिंदूचा त्रास आढळलेल्या पात्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांना जळगाव येथे ने-आण करण्याची तसेच प्रवासासह इतर अनुषंगिक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे. निवड झालेल्या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे पूर्णतः विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ.अनंत लांडगे, डॉ.गौरव चौधरी यांनी आपली मोलाची सेवा दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
मंत्री गिरीश महाजन हे संपूर्ण महाराष्ट्रात ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जातात. आरोग्यसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा आम्हाला नेहमीच मिळते. ग्रामीण भागातील गरजू आणि वयोवृद्ध नागरिकांना वेळेत आरोग्यसेवा मिळावी, विशेषतः डोळ्यांच्या आजारांवर मोफत उपचार व्हावेत, या उद्देशाने या मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळातही अशाच प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केले.
गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये आरोग्यविषयक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी यावल कृउबा सभापती उज्जैनसिंग राजपूत, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास चौधरी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपा तालुका सरचिटणीस भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, अकलूद भाजपा बुथप्रमुख नितीन सपकाळे, माजी सरपंच कैलास सपकाळे, भगवान कोळी, जे. डी. पाटील, रजनिकांत पाटील, सुभाष भोई, गोविंद भोई, अनिल कोळी, ईश्वर सपकाळे, पंकज मोरे, यशवंत चौधरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










