राज्य ग्राहक तक्रार निवारण अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : फायनान्स कंपनीद्वारे हप्ते थकल्याने वाहन जप्तीची प्रक्रिया थांबवण्यासाठी चार हजारांची लाच मागणार्या महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचचे अधीक्षक/शिरस्तेदार घनश्याम आसाराम सोनवणे (50, रा.शिव कॉलनी, प्लॉट नं 19, मारुती पार्क, जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
चार हजारांची लाच घेताना आवळल्या मुसक्या
जळगाव शहरातील 30 वर्षीय तक्रारदाराने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून वाहन घेतले मात्र काही कारणास्तवर कर्ज हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र तक्रारदार यांनी त्यांचे वाहन जप्त न होण्यासाठी स्टे ऑर्डर मिळविण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगावकडे अर्ज केला होता. स्टे ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 29 रोजी चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी ग्राहक मंच कार्यालयाजवळील एका चहाच्या दुकानावर सोनवणे यांना बोलावण्यात आले तर चार हजारांची लाच तक्रारदार आरोपीला देत असताना पथकाला आरोपीला अटक केली. ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.




