स्वातंत्र्य दिनी राज्यपाल करणार आत्मनिर्भर भारत सेल-डीबाटूचे उद्घाटन


भुसावळ : विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कल्याण अन् कौशल्य विकास साधणारी, राष्ट्रप्रेम बाणवणारी, प्राचीन संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करणारी आणि विद्यार्थ्यांमधील आत्मतेज जागृत करणारी शिक्षणपद्धत देशात लागू होत आहे व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये ‘आत्मनिर्भरता’ आणणे हा उद्देश ठेवून आर्थिक स्तरावर बळ देणे व यशाची व्याप्ती वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरेतर्फे आत्मनिर्भर भारत सेल- डीबाटू ची स्थापना शनिवार, 15 रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार आहे. प्रसंगी माहिती व तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुलगुरू डॉ.वेदला रामा शास्त्री व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

आत्मनिर्भरतेचे पंख भारतासाठी ठरणार गरूडझेप
कोरोनामुळे उद्भवलेल्या भयंकर आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा जो मार्ग निवडला आहे, तो निश्चितच प्रशंसनीय आहे. देशावर आलेलं कोरोनाचं हे एक संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे. हे करतांना सरकारने देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे अंगिकारलेले धोरण भारताच्या विकासाच्या प्रयत्नांना निश्चितपणे शाश्वत आयाम देणारे आहे. आत्मनिर्भरतेचे पंख विद्यार्थ्यांना पर्यायी भारताला गरुडझेप घेण्यास साहाय्यभूत ठरतील, असे कुलगुरू डॉ.वेदला रामा शास्त्री यांनी कळविले आहे.

तरुणांसह विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हेच उद्दिष्ट
महाराष्ट्रात अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांचे तातडीने पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील कोणत्याही दीर्घकालीन जागतिक आर्थिक संकटाशी लढण्यासाठी देशातील तरुण, विद्यार्थी यांना सक्षम बनविणे, असे दुहेरी उद्दिष्ट असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर भर देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाधारित 21 व्या शतकात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रोजगारासाठी आवश्यक असणारी कौशल्ये वाढविणे हे कार्य या सेलच्या माध्यमातून होणार आहे, असे विध्यापीठाचे असोसिएट अकॅडेमिक डीन प्रा.डॉ.राहुल बारजिभे यांनी सांगितले आहे.

ऑनलाईन बक्षीस दिले जाणार
कार्यक्रमानंतर युनिव्हर्सिटीतर्फे इयत्ता 10, 11 व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फोटो निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम बक्षीस सात हजार रुपये द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये, तृतीय बक्षीस तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दीड हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने दिले जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://www.youtube.com/channel/UC7-HIEyzyYUonulPW-wWYEg या युट्यूब लिंकच्या माध्यमातून सर्वांना बघायला मिळेल. जिल्ह्यातील सर्व भावी अभियंत्यांनी, पालक, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वेदला रामशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे निमंत्रक डॉ.दर्शना देसाई, डॉ.राहुल बारजिभे, डॉ.नरेंद्र काटीकर, डॉ.निलेश पाटील, डॉ.एच. एस.जोशी, डॉ.प्रमोद देवरे परीश्रम घेत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !