गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करीत दिला मदतीचा हात
अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाऊंडेशनतर्फे 5 दिवसात 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
भुसावळ : शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबवण्यात आला व या उपक्रमात उषा फाउंडेशन सुद्धा सहभागी झाले. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात पाटी, पेंसील, वह्या, पेन, रंगपेटी, पट्टी, खोडरबराचा समावेश आहे.
मुसाळतांड्यात उपक्रमाचा समावेश
निरंतर पाच दिवसापासून राबविण्यात येणार्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परीषद शाळा मुसाळतांडा येथील आदिवासी वस्तीवर करण्यात आला.उपक्रमाची सुरुवात यावल तालुक्यातील बामणोद येथील जि.प.उर्दू शाळा येथून झाली. त्यात नंतर कोसगाव जि.प.शाळा, भुसावळ तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या मांडवेदिगर, महादेव माळ या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दाखवलेल्या मार्गाने अंतर्नाद उषाची वाटचाल सुरु आहे. भविष्यात ह्या शैक्षणिक चळवळीला व्यापक स्वरुप यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विजय पाटील होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष राजू राठोड, ग्रामपंचायत सदस्य शामराव राठोड, उषा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे, पांडुरंग महाजन, मुख्याध्यापक दीपक सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे यांनी केले. प्रस्तावित प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी समन्वयक निवृत्ती पाटील यांनी माहिती दिली. आभार सह समन्वयक भूषण झोपे यांनी मानले. या प्रसंगी माजी ग.स.संचालक योगेश इंगळे, उषा फाउंडेशनचे सचिव जीवन महाजन, प्रवीण मोरे, सौरव जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
उपक्रमास स्व.शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ उषा पाटील यांनी तर स्व.सोमा जावळे यांच्या स्मरणार्थ मालती जावळे यांनी शैक्षणिक साहित्य दिले.सोबतच हर्षद महाजन, रघुनाथ सोनवणे, किरण पाटील, किरण चौधरी, सचिन पाचपांडे, दीपक पाटील, लैलेश मास्टे, भूषण शेरीकर यांनीही सहकार्य केले.
दात्यांची संख्या वाढावी
सण उत्सवांना सामाजिक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब गरजवंत विध्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे. दात्यांनी अश्या उपक्रमाना भरभरून मदत केली पाहिजे, असे आदर्श शिक्षक विजय पाटील म्हणाले.
भविष्यात व्यापक स्वरूप
अंतर्नाद सोबत आम्हीही पहिल्यांदाच या उपक्रमाच्या निमित्ताने जुळलो.एक दुर्वाच्या माध्यमातून गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता आली याचे फार मोठे समाधान आहे.भविष्यात गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाला अजुन व्यापक स्वरुप देउ, असे उषा फाउंडेशनचे सचिव जीवन महाजन यांनी नमूद केले.
शिष्यवृत्ती सुरू करणार
या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब आणि गरजवंत होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अंतर्नादच्या माध्यमातून विविध प्रसंगी वर्षभर विद्यार्थ्यांना मदत केलीच जाते पण दात्यांचे अधिकचे पाठबळ मिळाले तर येणार्या काळात अंतर्नादतर्फे गरीब गरजवंत हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुध्दा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी नमुद केले.

