स्व.हरीभाऊंनी स्वकष्ट व मेहनतीने पक्षात स्वतःचे निर्माण केले स्थान
माजी मंत्री गिरीश महाजन : ‘आठवणीतले हरीभाऊ’ कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळा
फैजपूर : माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्ताने 3 ऑक्टोबर रोजी भालोद येथे व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन स्व.कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमत केंद्रातील आणि राज्यातील आजी-माजी मंत्री ऑनलाईन सहभागी झाले आणि याच माध्यमातून सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोना सदृश्य परीस्थितीमुळे या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महराज, भक्ती प्रकाशदास शास्त्रीजी, सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शशिकांत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक शशिकांत गाजरे यांनी केले. सूत्रसंचालन जतीन मेढे यांनी तर आभार भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांनी मानले.
निगर्वी नेता हरीभाऊ : उल्हास पाटील
ज्यांनी राजकारणात सुद्धा कटुता निर्माण केली नाही, असे निगर्वी आणि संयमी नेता म्हणजे हरीभाऊ. भाऊंच्या नावाने येणार्या काळात संस्था तयार करून मोठे काम त्या माध्यमातून करण्याच आम्ही ठरवले असल्याचे माजी खासदार उल्हास पाटील म्हणाले.

हरीभाऊंचे योगदान नेहमीच स्मरणात : एकनाथराव खडसे
दुरदृष्टीने काम करणारा नेता म्हणजे हरीभाऊ. यावल-रावेर भागातील सिंचनाच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला. शेळगांव आणि मेगा रीचार्जसाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले.
पक्षाची उंची वाढवणारा नेता : गुलाबराव पाटील
माणसांमधे माणसाळलेला साधा माणूस म्हणजे हरीभाऊ. पक्षाची उंची वाढवणारा नेता म्हणजे हरीभाऊ. केळीला फळाचा दर्जा मिळावा म्हणून भाऊंनी सातत्याने पाठपुरावा केला. आपण सर्व मिळूनही भविष्यात याच गोष्टीचा पाठपुरावा केल्यास भाऊंना ही खर्या अर्थाने श्रद्धांजली असेल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
पक्षाची मोठी हानी : गिरीश महाजन
हरीभाऊंनी स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने पक्षात स्वतःचे स्थान निर्माण केले. भाऊंना पाण्याविषयी आणि शेतकर्यांन विषयी तळमळ होती. हारजीत झाली किंवा खासदारकीच तिकीट कापल्या गेल पण ते आज पर्यंत पक्षाच्या विरोधात कधीही बोलले नाही.त्यांच्या जाण्याने पक्षाच खुप मोठ नुकसान झाल असल्याचे भावना माजी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. प्रत्येकाला सन्मानाने वागवणारे आणि सातत्याने विकासाच्या चर्चा करणारे हरीभाऊ कायमच स्मरणात राहतील, असे केंद्रीय मानव संसाधन मंत्री संजय धोत्रे म्हणाले.
भाऊंचे योगदान पुढील पिढीला सांगण्याची गरज
भाऊंनी केळी विषयाला वाहून घेतल होत.लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारे,मतदारसंघाची जपणूक करणारे हरीभाऊ कायमच स्मरणात राहतील.शेती, माती, पाणी आणि केळी साठीच त्यांच योगदान पुढच्या पिढीला आवर्जून सांगितले पाहिजे, असे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. कार्यकर्ता म्हणून जगलेला, कधीही श्रेयवादात न अडकलेला शुद्ध सात्विक आणि संयमी नेता म्हणजे हरीभाऊ असल्याचे बेटी बचावचे संयोजक राजेंद्र फडके म्हणाले.
आदर्श विचारांचा आणि कर्तुत्वाचा वारसा म्हणजे हरीभाऊ
शेती आणि शेतकरी, कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेऊन जगणारा नेता म्हणजे हरीभाऊ.आदर्श विचारांचा आणि कर्तुत्वाचा वारसा म्हणजे हरीभाऊ असल्याचे जैन इरीगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले. पक्षाशी एकनिष्ठ, कटीबद्ध, पक्षावर श्रद्धा असणारे नम्र , मिलनसार, कार्यकर्त्यांसाठी आदर्श म्हणजेच हरीभाऊ. त्यांचे अचानक जाणे दुर्भाग्यपुर्ण असेच आहे.त्यांच्या जाण्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे कार्य, आदर्श विचारधारा आपल्याला कायमच दिशादर्शक ठरतील, असे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
माणसातला देव माणूस म्हणजे हरीभाऊ
माणसातला देव माणूस म्हणजे हरीभाऊ, असे जनार्दन हरीजी महाराज यांनी नमूद केले. शरीराने हरीभाऊ आपल्यात नसले तरी कर्तव्याच्या माध्यमातून ते आपल्यात कायम जिवंत असतील, असे भक्तीप्रकाश शास्त्री यांनी नमूद केले. राजकारणाच्या चिखलात राहूनही कमळासारखे स्वच्छ चारीत्र्यवान नेते म्हणजे हरीभाऊ. भाऊंच्या वागण्यात आणि बोलण्यात साधेपणा होता, ते कायमच संताचा आदर करत. भाऊ त्यांच्या विचारांनी कायमच आपल्या सोबत असतील आणि आम्ही सर्व संत मंडळी कायमच त्यांच्या परीवारा सोबत आहोत, से सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी नमूद केले. आपण सर्वांनी या कठीण काळात जे प्रेम आणि सहकार्य केले त्याची उतराई होण्याचा प्रयत्न येणार्या काळात मी नक्कीच करणार आहे, असे अमोल जावळे यांनी नमूद केले. याप्रसंगी रावेर यावल तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपाचे आणि इतर पक्षीय सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

