राज्यात उद्यापासून पंधरा दिवस संचारबंदी
मुंबई : कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या (14 एप्रिलपासून) रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या आदेशामुळे आता आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. सध्याची स्थिती नियंत्रणात आली नाही तर स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या
मुख्यमंत्री म्हणाले की, आपण एमपीएससी तसेच बारावी आणि दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर कोरोनाच्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हावयाचे आहे. सध्या 1200 मेट्रीक टन इतके ऑक्सीजनचे उत्पादन होत असून याचा 100 टक्के वापर हा कोरोनाच्या प्रतिकारासाठी होत आहे. सध्या राज्यात बेड मिळत नाही. ऑक्सीजन अपूर्ण पडत आहे. रेमडेसिवीरची मागणी वाढलेली आहे. आता हळूहळू याचा पुरवठा सुरू झालेला असून यात कुठेही कमतरता होणार नाही. अलीकडेच आपण पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत आपण माहिती त्यांना दिली. आपण एकही रूग्णसंख्या आणि मृत्यू संख्या लपवत नाहीय हे आपल्याला पहिल्या दिवसापासून माहितच आहे. आम्हाला इतर राज्यातून ऑक्सीजन मागविण्याची मागणी आपण केली. याला पंतप्रधानांनी मान्यता दिली असून मात्र यासाठी थोडा वेळ लागणार आहे. रस्त्याने ऑक्सीजन आणण्यासाठी अडचण येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र रस्त्याने ऑक्सीजन येईपर्यंत राज्यात अडचण निर्माण होईल. मात्र यासाठी हवाई वाहतूक करून ऑक्सीजन करावा अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ही उणी-दुणी काढण्याची वेळ नाही
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, ही उणीदुणी काढण्याची वेळ नाही. आता जर आपण राजकारण केले तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. आपण पंतप्रधानांना याबाबत आवाहन करून सर्व पक्षीय नेत्यांनी बैठक घेण्याची मागणी केली आहे. तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठीण निर्बंध घालावे लागणार आहे. जीव वाचला तर सर्व काही आहे. यासाठी 14 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. याला पंढरपूर येथील निवडणूक असल्याने तेथे शिथीलता देण्यात येणार आहे. तेथे निवडणूक झाल्यानंतर निर्बंध लागू होणार आहेत.
