हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे उघडले


तापीला पूर ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ- हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर कायम असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रातील गोपाळखेडा, लोहारा, देडतलाई, टेक्सा, चिखलदरा व बर्‍हाणपूर आदी सर्व पर्जन्यमापक स्थानकांवर गुरुवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ या 24 तासांमध्ये 453 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर त्यानंतर अवघ्या चार तासात पुन्हा 193 मिलिमीटर पाऊ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाभक्षेत्रात पावसाने 41 दरवाजे उघडले
तापी-पूर्णासह धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ सुरू आहे. गुरुवारी सकाळी धरणाच्या 36 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता दुपारी एक वाजेच्या सुमारास संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून प्रति सेकंद तीन 995 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून धरणाची जलपातळी 206.100 मीटर तर धरणात 26.27 200 टक्के (क्यूमेक्स) जलसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात दुसर्‍यांदा पूर्णपणे उघडले दरवाजे
धरणावरील सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात दुसर्‍यांदा धरणाचे पूर्णपणे दरवाजे उघडण्यात आले. यापूर्वी 29 जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आले होते तर 24 तासानंतर ते बंद करण्यात आले.

भुसावळात संततधारमुळे जनजीवन विस्कळीत
भुसावळ बुधवारी रात्री पासून सुरू असलेला पाऊस गुरुवारीदेखील कायम होता. संततधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने पादचार्‍यांसह वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले शिवाय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील रस्ते आधीच मरणासन्न अवस्थेत असताना पालिकेकडून साधी डागडूजी न झाल्याने रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला.

गिरणा धरणात 56 टक्के साठा
चाळीसगावजवळील गिरणा धरणात गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 56 टक्के टक्के साठा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने सायंकाळपर्यंत आणखी साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.


कॉपी करू नका.