रसलपूर कक्षाच्या उदासीन धोरणांमुळे सौभाग्य योजना पोहोचले मर्यादीत कुटुंबापर्यंत
दोन वर्षात दिले अवघे 221 कनेक्शन : वरीष्ठ अधिकार्यांनी दखल घेण्याची अपेक्षा
रावेर : आदिवासी व गरीब कुटुंबाना घरोघरी विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य ही महत्वकांशी योजना अंमलात आणली खरी मात्र महावितरण कंपनीच्या रसलपूर कक्षाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी भागातील केवळ अकरा गावात दोन वर्षात 221 वीज कनेक्शन देण्यात यश आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वरीष्ठ अधिकार्यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.
योजनेच्या जनजागृती यंत्रणा फेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, आदिवासी कुटुंबाच्या घरात वीज पोहचण्यासाठी 25 सप्टेंबर 2017 रोजी ‘सौभाग्य’ योजना आणली. या योजनेंतर्गत जनतेपर्यंत वीज पोहोचण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रचंड प्रयत्न करीत आहे मात्र तालुक्यातील महावितरणचे रसलपुर कक्ष याबाबत प्रचंड उदासीन असल्याचा आरोप होत आहे. आदिवासी भागात आता पर्यंत अल्पशे 221 वीज कनेक्शन देण्यात आले आहे तर भागतील बर्याच लोकांना या योजनेबद्दल माहितीच नाही. यामुळे या योजनेचे महत्व गरीब जनते पर्यंत पोहचविण्यात येथील महावितरण सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप होताना दिसून येत आहे.



महावितरणच्या रसलपुरला लागून आहे आदिवासी भाग
आदिवासी भागातील महावितरण रसलपुर कक्ष अंतर्गत येणार्या आभोडा- 1, बक्षीपूर-12, खिरोदा- 24, मुंजलवाडी- 23, पाल- 34, रमजीपुर- 53, रसलपूर- 58 आणि जिन्सीला- 1 या प्रमाणे सौभाग्य योजनेमार्फत कनेक्शन देण्यात आले मात्र गारखेडा, मोरव्हाल, निमड्या या आदिवासी गावात अद्याप एकही कनेक्शन देण्यात आलेले नाही शिवाय येथल्या ग्रामस्थांना योजनेबाबत माहितीच नाही.
